भंडारा – राज्यात रविवारी 48 हजाराहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महराष्ट्राचे नाव आहे. अशातच आता भंडारा जिल्ह्यातील तब्बल 90 गावात करोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती समोर आली आहे. या गावांतील लोकांनी पाळलेल्या शिस्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. लोक आपल्या नातेवाईकांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी हैरान असल्याचे दिसते. मात्र भंडारा जिल्ह्यातील 90 गावांमध्ये अशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही. इथे एकही करोना रुग्ण नाही. येथील लोकांचे नियमांचे पालन करून आपआपले दैनंदिन काम सुरु आहे.
असं रोखलं कोरोनाला –
येथे कोरोनासंबंधी नियम बनवण्यात आले होते. त्या नियमांचे सर्व गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन केले. गावातील प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक केले होते. गावात वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात आले. तसेच जे लोक कामासाठी बाहेर जात असत त्यांनाही अलर्ट करण्याबरोबर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले. गावातील लोकांनी आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करून करोनाला गावाच्या वेशीबाहेरच ठेवले.
लसीकरणावर जोर –
जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उइके यांनी सांगितले की, या गावांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी जनजागृती अभियान सुरु आहे. तसेच येथील लोकांनी आपली जबाबदारी ओळखून यापुढेही नियमांचे पालन केल्यास हि गावे करोनापासून दूर राहतील, असे प्रशात उइके यांनी सांगितले.