नवी दिल्ली – भारतातील सक्रीय रूग्णांच्या संख्येत सतत घट होत असून सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा कमी म्हणजे 7 लाख 83 हजार 311 इतकी आढळली. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एकूण पॉझिटीव्ह रूग्णांच्या 10 टक्के इतकी आहे.
देशातील 13 राज्यांमध्ये सक्रीय रूग्णांची संख्या 20 हजारापेक्षा जास्त पण 50 हजारांपेक्षा कमी आहे, तर 3 राज्यांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त सक्रीय रूग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 65 लाख 97 हजार रूग्ण बरे झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा दर वाढून आता तो 88 टक्के इतका झाला आहे.
गेल्या 24 तासांत 72,614 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर 61,871 नवीन रूग्ण आढळले आहेत. नवीन बरे झालेल्या रूग्णांपैकी 79 टक्के रूग्ण 10 राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवशी, 14 हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून, रूग्ण बरे होण्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत 61,871 नवे रूग्ण आढळून आले आहेत.
नव्या रूग्णांपैकी 79 टक्के रूग्ण 10 राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात आजही दररोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून त्यांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर केरळ येथे 9 हजार नवे रूग्ण आढळून आले आहेत.
गेल्या 24 तासांत 1,033 लोकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. यातील 44 टक्क्यांपेक्षा जास्त नवे मृत्यू महाराष्ट्रात झाले असून 463 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.