हिंजवडी -म्हातोबाच्या नावानं चांगभलं…अशा जयघोषाने आयटीनगरीचा आसमंत धुमधुमून निघाला. करोना महामारीमुळे मागील दोन वर्षे हिंजवडी, वाकड व पंचक्रोशीतील नागरिकांना बगाड यात्रा साजरी करता आली नव्हती. परंतु यंदा करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने हिंजवड, वाकड परिसरातील व महाराष्ट्रातून लाखो भाविक बगाड उत्सावाला दाखल झाले होते.
शनिवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजता साखरे पाटील घराण्यातील किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्याच्या निवडीची घोषणा केली. जांभूळकर घराण्यातील रामदास शिवाजी जांभूळकर या तरुणाला यंदाचा गळकरी होण्याचा मान मिळाला. तर दीपक दामू साखरे व संदेश गुलाब साखरे यांना खांदेकऱ्याचा बहुमान मिळाला. हुलावळे परिवारातील श्रीरंग हुलावळे यांना काठीचा मान मिळाला.
पैस… पैसचा जयघोष करत वाजत्र्यांच्या सनई चौघाड्याच्या निनादात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात आणण्यात आले. या वेळी त्यास स्नान घालण्यास जमलेल्या महिलांनी गर्दी केली. गळकऱ्याची विधिवत पूजा केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गळऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात अभ्यंग स्नान घालून वाजत गाजत होळी पायथ्याजवळ आणण्यात आले. त्यानंतर संदीप साखरे व सुतार समाजातील पांडुरंग सुतार यांनी गळकऱ्याला गळ टोचला.
या वेळी हातातील काठी उंचावून होणारा काठी नाद तसेच पैस… पैस.. व म्हतोबाच्या नावान चांगभलंचा जयघोषाने अवघी आयटीनगरी दुमदुमली होती.गळकरी व खांदेकऱ्यांचे पाय धुण्यासाठी व त्यांना पाणी पाजण्यासाठी पाण्याच्या घागरी घेऊन महिला गर्दीतून वाट काढत होत्या. बगाड रिंगण मैदानात गळकरी रामदासला आणल्यानंतर बगडावर बसवून हजारो भाविकांच्या साक्षीने गोल रिंगण घालून त्यास गोलाकार फिरवण्यात आले. यानंतर हजारो भाविकांच्या जयघोषात या मिरवणुकीचे वाकडच्या दिशेने प्रस्थान झाले.
खिल्लारी बैलजोड्या जुंपण्यासाठी चुरस
हिंजवडी वाकडमध्ये शहरीकरण झाले असले तरी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आवड म्हणून घरी खिल्लारी बैल पाळले आहेत. यातील काहीजण बैलगाडा शर्यतीत तर काहीजण पंढरपूरच्या पायी वारीतील रथाला आपल्या बैलजोड्या जुंपतात. सजवलेल्या बैलजोड्या या बगाड मिरवणूक रथाला जोडण्यासाठी जीवन जांभूळकर, मनोज साखरे तसेच माणचे वसंत बोडके यांच्यासह अनेकांच्या बैलजोड्या मिरवणूक रथापुढे दाखल झाल्या होत्या.
आयटीयन्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या पारंपरिक सोहळ्यात स्थानिक भविकांसोबत यंदा आयटी अभियंते मोठ्या हिरारीने व स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. त्याच्या मुखातून होणारा म्हातोबाचा जयघोष लक्ष वेधनारा होता. त्यामुळे आयटीयन्सनाही या उत्सवाची चांगलीच भुरळ पडली असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. सेल्फी व गर्दीचे चित्रण काढण्यात आयटीयन्स मग्न होते.