रुक्मिणी बॅनर्जी
इतक्या दिवसांनी सुरू झालेल्या शाळेत मुलं नियमितपणे जाऊ लागली आहेत, तर मुलांना आणि शिक्षकांना खऱ्या अर्थाने एकमेकांची ओळख व्हावी आणि मुलांना पुन्हा शाळेची गोडी लागावी यासाठी त्यांना थोडा वेळ का देऊ नये?
देशभरात शाळा पुन्हा सुरू झाल्या आणि मुले उत्साहाने आणि नवी ऊर्जा घेऊन वर्गात येत आहेत. शिक्षक बराच काळ या क्षणाची वाट पाहात होते. गेल्या महिन्याभरात अनेक राज्यांतील काही जिल्ह्यांना भेट देण्याची संधी मिळाली. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका ब्लॉकमध्ये पोहोचलो. देशातील इतर राज्यांप्रमाणे सिमडेगा येथील शाळाही बराच काळ बंद होत्या. महामारीमुळे मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत शाळा पूर्णपणे बंद होत्या. नवीन वर्षात कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद ठेवाव्या लागल्या. आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा दुपारची वेळ होती. मुलांच्या स्वागतासाठी शाळेत रंगकाम आणि सजावट करण्यात आली होती. वऱ्हांड्याच्या बाजूने आम्ही सहावीच्या वर्गात आलो. वर्गखोली भरून गेली होती. मुलींच्या केसातील लाल रिबिनी फुलासारख्या दिसत होत्या. हाफ पॅंट, शर्ट आणि टाय घातलेली मुलं स्मार्ट दिसत होती. प्रत्येकाने आपापल्या परीने शाळेत येण्यापूर्वी कसून तयारी केल्याचे दिसत होते.
फळ्यावर अनेक मिठाईंची नावे लिहिली होती. मी विचारले, “काय वाचत आहात?’ कोणीही उत्तर दिले नाही. सगळ्यांच्या डोळ्यांत उत्सुकता होती; पण कुणाच्या तोंडून आवाज मात्र निघत नव्हता. खूप प्रयत्न केल्यावर काही मुले दबक्या आवाजात बोलू लागली. हळूहळू सगळ्यांनी आवडत्या पदार्थांची नावे सांगितली. काही नवीन नावेही ऐकू आली. धुस्का, गुलगुला अशा पदार्थांची नावे होती. घरात सदरी, मुंडारी किंवा खाडिया यांसारख्या भाषा बोलणाऱ्या मुलांना शाळेत येऊन हिंदीत संभाषण करणे, तेही अपरिचित व्यक्तीशी कठीण जात होते. कदाचित असेही असू शकते की, शाळा इतके दिवस बंद असल्यामुळे मुलांना संकोच वाटत असेल. ही समस्या फक्त झारखंडमध्येच आहे असे नाही. जिथे घरी बोलली जाणारी भाषा आणि शाळांची भाषा यात तफावत आहे, तिथे मोठ्या संख्येने मुले शालेय भाषा विसरली आहेत. जिथे या दोन भाषांमधील तफावत अधिक आहे, तिथे मुलांना शिक्षकांशीही संवाद साधण्यात अडचणी येत आहेत.
मुलांची वाचण्याची क्षमताही थोडी कमकुवत झाली आहे. वाचताना बरीच मुलं अडखळत असल्याचे आढळून आले. मुलांची लिहिण्याची सवयही मोडली आहे. प्राथमिक वर्गांमधील मुले आजही त्यांच्या जुन्या मित्रांसोबत शाळेत येण्याचा, मैदानात खेळण्याचा आनंद घेत आहेत; परंतु थोड्या मोठ्या म्हणजे सातवी-आठवीतील मुलांना साधे उपक्रम करताना त्रास का होतो आहे, याचे वाईट वाटले. झारखंडनंतर मला आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जाण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागात सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती आहे. शिक्षकांसमोर नवीन आव्हाने आहेत. शाळेच्या सहावीच्या वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकाचे म्हणणे असे की, साथीच्या आजारानंतर मुलांची वाचनाची पातळी घसरली आहे; पण त्याच वर्गातील मुलांमधील शिकण्याच्या क्षमतेतील तफावतही वाढली आहे. कुठून सुरुवात करावी, कुणाला शिकवावे, हेच समजत नाही.
उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, महामारीच्या काळातही वाचन आणि लेखनाची स्थिती समाधानकारक नव्हती. 2018 च्या “असर’ (शिक्षणाच्या वार्षिक स्थितीचा अहवाल) सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भारतात इयत्ता तिसरीमधील सरासरी केवळ 30 टक्के मुलेच वर्ग स्तरावर अभ्यास करू शकली. पाचव्या वर्गात पोहोचेपर्यंत 50 टक्के मुले साधी वजाबाकीची गणिते सोडवू शकली नाहीत. (उदाहरणार्थ, 85-17). महामारीच्या काळात बराच काळ शाळा बंद राहिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. एप्रिल महिन्यात मुले नवीन वर्गात जातात. अनेकदा त्याच्या आधी परीक्षा असतात. झारखंडसारख्या राज्यात आठवीच्या वर्गात बोर्डासारख्या परीक्षा होतात. मनात प्रश्न येतो की, अशा स्थितीत यंदा परीक्षा घेणे योग्य आहे का? परीक्षेचा निकाल चांगला लागला नाही, तर मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यांचे मनोबल ढासळते.
इतक्या दिवसांनी सुरू झालेल्या शाळेत मुलं नियमितपणे जाऊ लागली आहेत, तर मुलांना आणि शिक्षकांना खऱ्या अर्थानं एकमेकांची ओळख व्हावी यासाठी आपण त्यांना थोडा वेळ का देऊ नये? साथीच्या आजारापूर्वीही अनेक मुलांना त्यांच्या वर्गाचा अभ्यासक्रम अवघड वाटत होता आणि शिक्षकांना वर्गानुसार शिकवणे अवघड वाटत होते. आता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत क्षमता मजबूत करण्यासाठी वेळ का देऊ नये? समजून घेऊन वाचणे, आपला दृष्टिकोन व्यक्त करणे, साधी गणिते करणे हे मुलांचे हक्क असायला हवेत. आपण प्रौढांनी मुलाला या क्षमता आत्मसात करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी आपण प्राधान्याने वेळ दिला नाही आणि त्या दूर झाल्या नाहीत, तर येणाऱ्या अनेक वर्षांत तो कमकुवतपणा मुलांना छळत राहील. उंच इमारतीसाठी पाया मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांसाठी वर्गनिहाय अभ्यासक्रम हटविण्याची गरज आहे. आपण सगळे मिळून मुलांचा पाया मजबूत करूया. त्यांचा आत्मविश्वास वाढवूया आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल असेल, असा विश्वास त्यांना देऊ या.