पुणे – , बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. बुलढाण्यातील ही दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं होतं मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. बुलढाणा येथील अपघातस्थळाची पाहाणी केल्यानंतर अमरावती आरटीओने हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
अशात आता या अपघाता बाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. नागपूर-पुणे बस अपघातानंतर ट्रॅव्हल्स ऑपरेटरकडून प्रवाशांची यादी उपलब्ध करून देण्यात आली. पण, त्यात एकाही प्रवाशाचे पूर्ण नाव नव्हते. शिवाय, एकाच्याही पत्त्याचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. तर, ज्या संपर्क क्रमांकांचा उल्लेख आहे, ते मोबाइलही अपघातात नष्ट झाले असण्याची शक्यता आहे.
तसेच एक नामांकित वृत्तपत्राच्या ग्राउंड रिपोर्टींग वृत्तानुसार,’विदर्भ ट्रॅव्हल्सने बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती. संपर्क करताना अडचणी आल्या. योगेश व साईनाथ हे सीट क्रमांक १९ व २० वर बसले होते. मात्र, ते बुकिंग स्टारलिंक ट्रॅव्हल्सच्या नावे होते. जेव्हा पत्रकाराने संबंधित क्रमांकावर फोन केला असता तो तिसऱ्याच ट्रॅव्हल्सचा निघाला. तेथील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार या सीटसवर एक महिला व पुरुष प्रवास करीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या जागांवर बुटीबोरी येथून दोन तरुण बसले होते.’ त्यामुळे सीटच्या माहितीत गोलमाल असल्याचे निदर्शनात आले आहे.
तसेच खासगी बसेसद्वारे होणाऱ्या प्रवासी सेवेची ठोस नियमावली आवश्यक असल्याचे नागपूर-पुणे बस अपघातानंतर पुन्हा समोर आले आहे. अपघातानंतर जखमी आणि मृत प्रवाशांचा कुठलाही ठोस डेटा तातडीने उपलब्ध होत नव्हता. शासनाकडून अशा बससेवेच्या तिकीट बुकिंगसाठी नियमावलीच अस्तित्वात नसल्याने प्रवाशांचे पूर्ण नाव, पत्ता या ट्रॅव्हल्स ऑपरेटरच्या यादीत नव्हता. एकाही प्रवाशाचा बस ऑपरेटरकडून “ट्रॅव्हल्स इन्शुरन्स’ काढलेला नसावा, अशा एक ना अनेक “सरकारी’ त्रुटी समोर आल्या आहेत.