आपल्या आनंदसरी कुठून येतात कधी विचार केला आहेत का? आनंद म्हणजे नक्की काय बरं? “आनंद म्हणजे ज्या गोष्टींनी मनाला उत्साह वाटतो, जगण्याकडे कल वाढतो, चेहऱ्यावर हसू उमटतं, अशा गोष्टी.’ अनेकदा अशा आनंदाचं मूळ आपल्या भूतकाळातील काही छान सुंदर क्षणांमध्ये असतं, पण भूतकाळातल्या गोष्टी आठवताना किती वेळा तुम्हाला आनंदाचे क्षण आठवतात? किंवा आपल्याला येणाऱ्या गतकाळातील आठवणींमध्ये किती चांगल्या आठवणी असतात? अगदी स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला उत्तर दिलंत तर आपल्याला जे राहून गेलं,
मिळालं नाही, कोणी अपमान केला, वाईटसाईट बोललं त्या आठवणीच जास्त असतात. चांगल्या आठवणींचं प्रमाण तुलनेने कमी असतं. कारण, आपला स्वभाव. भूतकाळाचा विचार करून उरलेल्या वेळात आपण सतत भविष्यात काय होईल, कसे होईल याचा विचार करत असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ महत्त्वाचे आहेतच; पण त्यांना अवास्तव महत्त्व देऊन आपण अनेकदा आपल्या “आज’ म्हणजे “वर्तमानकाळा’वर अन्याय करतो.
भूतकाळातल्या अप्रिय गोष्टी, अप्रिय आठवणी, अप्रिय प्रसंग यांचं ओझं असलेलं गाठोडं खांद्यावर घेऊन आपला आज म्हणजे वर्तमान का अप्रिय करायचा? त्यासाठी मागचं मागे सोडायला शिकायला हवं आणि उद्याची अवास्तव चिंता करणंही सोडायला हवं. बोलायला सोपं आहे, करणं अवघड. पण साधारण इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीला नक्कीच जमेल.
मला अजूनही आठवतात ते जुने दिवस. नोकरीच्या चक्रात रोज पहाटे उठून आपला डबा करून, लहान बाळाचं आवरून तिला पाळणाघर वजा प्ले ग्रुप स्कूलमध्ये सोडून कॉलेजचं बायोमेट्रिक मशीन गाठण्याच्या नादात, मी ती झोपेतून उठताना कशी दिसते, किती गोड दिसते हे बघायचं विसरूनच गेले होते. सतत डोळ्यासमोर तिच्यासाठी चांगली शाळा, चांगलं घर, बॅंक बॅलन्सचे आकडे, आपली पीएच.डी. हेच सगळं फिरत असायचं.
पुढे आता जेव्हा त्या चक्रातून उसंत मिळाली तेव्हा तिचं बालपण हातातून निसटून गेलं होतं आणि ज्या भविष्याच्या चिंतेने वर्तमानात जगणं विसरून गेले होते त्या भविष्यालाही वेगळं वळण मिळालं होतं. हे सगळं लक्षात येईपर्यंत आयुष्यातली काही चांगली वर्षे हातातून निसटून गेली होती आणि त्याच दरम्यान हेही जाणवलं होतं, की ज्या गोष्टी आपण बदलू शकत नव्हतो त्यांना अवास्तव महत्त्व देऊन आपण त्यावर विचार करत होतो आणि ज्या गोष्टी हातात होत्या त्याकडे दुर्लक्ष करत होतो. त्या हातात असलेल्या गोष्टींकडे बघणं, त्यांचा आनंद घेणं राहूनच गेलं.
आत्मपरीक्षण करता करता आणि या सगळ्यातून बोध घेता-घेताच एक दिवस यू-ट्युबवर एक छोटासा व्हिडिओ पाहिला आणि डोक्यात प्रकाश पडला. ती पुन्हा एक झेन स्टोरी किंवा बुद्धाची गोष्ट होती, जी आजही सतत लख्खपणे मनात आहे. तर झालं काय, की एकदा एका सतत चिंता करत असलेल्या स्त्रीला आपल्या या कंटाळलेल्या, दुःखी अवस्थेचाही कंटाळा आला होता. तिला रोजच्या जगण्यातही कंटाळवाणेपणा वाटायला लागला होता. म्हणून ती गावातल्या झेन गुरूंकडे गेली. त्यांना म्हणाली, मला कृपया मार्ग दाखवा. ते फक्त मंद हसले आणि म्हणाले, तो पाण्याने भरलेला वाडगा उचल आणि अंगणात फिरून ये.
तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण तिने पाण्याने भरलेला वाडगा उचलला आणि ती त्यांच्या आश्रमाच्या अंगणात गेली. चालताना वाडग्यातील पाणी हिंदकळत होतं, त्यामुळे तिचं लक्ष पाण्याकडे अर्ध आणि चालण्याकडे अर्ध. ती एक चक्कर मारून परत आली. गुरूंनी विचारलं, तुला काय दिसलं? ती म्हणाली, माझं लक्ष पाण्याकडे होतं, पाणी सांडेल म्हणून मी पाण्याकडे पाहात पाहात चालले.
मला काहीच दिसलं नाही. गुरू पुन्हा मंद हसले. म्हणाले, आता चालताना पाणी सांडेल याकडे लक्ष न देता अजून एकदा एक चक्कर मारून ये. तिला काही समजेना की ते नक्की असं का सांगत आहेत, पण तरीही तिने पुन्हा तो पाण्याने भरलेला वाडगा उचलला आणि ती अंगणात गेली. आता तिचं हातातल्या वाडग्याकडे फारसं लक्ष नव्हतं. तिने पाहिलं, की अंगणात खूप सुंदर फुलझाडांचे ताटवे आहेत. आश्रमाच्या परिसरात खूप फुलपाखरं, पक्षीही आहेत. अंगणात हिरवंगार गवत आहे. ती येताना त्या मऊ गवतावर चालत चालत परत आली. आता तिच्या चेहेऱ्याकडे निरखून पाहताना गुरूंच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा मंदस्मित उमटलं. त्यांनी विचारलं, आता काय जाणवलं?
ती स्त्री एक क्षण विचार करून म्हणाली, आता माझं लक्ष पाणी हिंदकळत आहे याकडे नव्हतं. फक्त जाणवत होतं की हातात भरलेला वाडगा आहे. मी थोडं इतरत्र पाहू शकले आणि मला सुंदर फुलझाडं, फुलपाखरं, पक्षी दिसले. मऊ गवतावरून चालायला खरच खूप छान वाटलं.
गुरू म्हणाले, तुझ्या हातातला वाडगा म्हणजे तुझा भूतकाळ आणि तुझं चालणं भविष्याकडे जाणारं आहे. भूतकाळावर जास्त लक्ष देऊन चालताना तुला आजूबाजूचं काहीच दिसलं नाही. तू अजूनच चिंतीत चेहऱ्याने वावरलीस. पण, तेच जेव्हा वाडग्याकडे लक्ष देऊ नकोस म्हणालो, तेव्हा तुला फक्त हातात तो आहे इतकीच जाणीव होती. तुला चालण्याचा आनंद घेता आला आणि शिवाय आजूबाजूच्या चांगल्या गोष्टीही दिसल्या. त्या स्त्रीला बोध झाला. ती हसतमुखाने घरी गेली.
किती सुंदर गोष्ट आहे ना? जे घडून गेलं आहे, आपण बदलू शकणार नाहीये अशा गोष्टींचं ओझं वाटून घेत त्यावर लक्ष केंद्रित करूनच आपण जगतो आणि मग रोज उगवणारा सुंदर सूर्य, त्यावेळी आकाशात होणारी रंगांची उधळण, घरातील लोकांचे हसरे चेहरे, दिवसभरात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीही आपल्या नजरेतून सुटून जातात. वर्तमानातील क्षण हे वाळू सारखे असतात. ते वाळूप्रमाणेच निसटतात. त्यांना उपभोगून मग निसटू द्या. त्या “आज’ मध्ये जगा… तरच आनंद मिळणार आहे. आनंद ही भावना आहे. ती कुठे विकत नाही मिळत, ती अशीच शोधायची आणि ती शोधली की हमखास सापडतेच सापडते.
– मृणाल काशीकर-खडक्कर