वादे अक्सर टूट जाते है और कोशिशे हमेशा कामयाब होती है।’, शराबी सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला कादर खान यांनी लिहिलेला हा डायलॉग आहे. यात लिहिल्याप्रमाणे आपण जेव्हा कधी कोणाला वचन देतो तेव्हा आपल्या समोर परिस्थिती असे काही खेळ खेळते की एकादे वचन पाळणे आपल्याला महाकठीण होऊन जाते. आपण वचन पाळायचा कसोशीने प्रयत्न करतो, पण व्यर्थ!
परिस्थिती आपल्याला गुडघे टेकायला लावतेच; कारण वचनासाठी प्राणही त्याग करणारे महापुरुष आपण नसतोच. आपण असतो फक्त परिस्थितीच्या हातातले बाहुले! नियती आपल्याला स्वतःच्या तालावर नाचवत असते. आपण मात्र वचन देताना सारे काही विसरून स्वयंभू होऊन वचने देत जातो. असहायपणे स्वतःच्याच हातानी ती तोडण्यासाठी आणि वचनभंगाचं दुःख काळजात घेऊन जगण्यासाठी. इथे उद्याचा दिवस आपण पाहू की नाही याची शाश्वती नसते आणि आपण जीवनभरासाठीची वचने देत सुटतो.
लोकांनाही शपथा, वचने यांचा फार सोस असतो. कुठलीही गोष्ट अगदी जीव तोडून सांगितली तरी ती त्यांना पटत नाही; मात्र शपथांचा आधार घेतला की मग ते निश्चिंत होतात. प्रेमातल्या आणाभाकांचीही हीच तऱ्हा. आभाळात भरारी मारणारी प्रेमीयुगुले मोठमोठ्या आणाभाका घेतात आणि काळाच्या एका तडाख्यात जमिनीवर येऊन आदळतात. मग जन्मभर त्या जखमा उरात घेऊन जगतात.
अगदीच नाही तर “तू असं वचन दिले होते, आता पालटलास’ “तू तेव्हा मोठमोठ्या बाता मारल्यास आता काय?’ असे टोमणे ऐकत जगावं लागतं. कारण कोणत्यातरी बाबतीत आपली वचनं तुटताचच. मग आपण उगाच वचन दिले असे वाटत राहते किंवा वचन देतेवेळी आपण एवढे गंभीर नसतो. सहजच म्हणून आपण अगदी कॅज्युअली वचन देतो. मात्र, समोरचा त्याच वचनाचा पाढा वाचत राहतो आणि मग अशी वचनं खूपच अंगावर येतात मग कधी असहायतेमुळे तर कधी मुद्दामहून आपण वचन तोडायला लागतो. कधी दुसऱ्याला फसवून कधी
स्वतःला फसवून.
मग वचन हा शब्द पोकळ वाटायला लागतो. काही वेळा फक्त समोरच्याच्या समाधानासाठी आपण वचन द्यायला लागतो. अगदी आपट्याची पानं द्यावी तशी! मग आपण वचन पाळायचे नाटक करू लागतो. स्वतःच्या मनाप्रमाणे वचनबद्ध शब्दांचे अर्थ वाकवतो. वचन, शपथ यांच्या मूळ अर्थावरच आपण घाव घालतो आणि त्यांचे खरे संदर्भच सोडून देतो. या सर्व गोष्टींचा कंटाळा येतो. जी वचने आपल्या नात्यातील वीण घट्ट होण्यासाठी बांधलेली असतात तीच मग नाती उसवायला लागतात.
समोरचा माणूस आपल्यापेक्षा वेगळा आहे, हेच आपण विसरतो. प्रत्येकासाठीचे प्रत्येक गोष्टीचे संदर्भ व्यक्तिनिष्ठ असतात ते आपण आपल्या मतानुसार वाकवायला जातो. मग वचनांची उद्दिष्टे बाजूलाच राहतात आणि आपण फक्त वरवरच्या शब्दांत गुंतून पडतो. या धडपडीत जे सगळं जुळून आलेलं ते तुटायला लागतं.
वचनांनी एकमेकांना एकमेकांवर लादण्यापेक्षा एकमेकांना थोडी स्पेस देत एकमेकांसाठी झटता येतचना! भुंग्याचं फुलावरील, आईच्या बाळावरील, पतंगाच्या ज्योतीवरील प्रेमात कुठे वचनांचा मागमूसही असतो का? असते फक्त निर्व्याज प्रेम. मग अशा क्षणभंगूर वचनांच्या नादी आपण का लागावं.
– योगेश सावंत