जामखेड -अचानकपणे झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे जामखेड तालुक्यातील शेती पिकांची व फळबागांची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार सोमवारी सकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर हजर लावून पाहणी केली.
नुकसानग्रस्त पिकांचे व फळबागांची पाहणी करून महसुल विभागाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. रविवारी सायंकाळी अचानपणे झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा, भाजीपाला, ग्रीनहाऊस, लिंबु आदींचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांची पडझड झाली. या नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची आ.पवार यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पाहणी केली. तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
जामखेड तालुक्यातील खांडवी, बाबी, राजेवाडी, झिक्री, बसरवाडी (शिऊर), नाहुली आदी गावांमधील शेती पिके व फळबागांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेली पिके आपल्या डोळ्यांदेखत ती वाया जाताना पहावे लागत आहे. त्यांचे अतोनात नुकसान झाले असुन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगत आ. पवारांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
वादळी पावसाने जामखेड येथील काही भागांमध्ये गारांचा सडा पडला होता तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने शेत तुडुंब भरले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतात साठवून ठेवलेला कांदा भिजला, लिंबाची झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी विजेचे खांबही तसेच विजेच्या तारा तुटून वीजप्रवाह खंडित झाला.
आ. पवारांच्या सुचनेनुसार महसुल विभागाकडून नुकसान झालेल्या फळबागांचे व पिकांचे सर्वेक्षण करून पंचनाम्याचे अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, कृषि अधिकारी शिंदे, मंडलाधीकारी तसेच संबंधित तलाठी उपस्थित होते.