मुंबई/नाशिक – बंगालच्या उपसागरात आणि गुजरातच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून राज्यभरात पावसाचा जोर कायम राहिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. परिणामी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचे हजेरी राहणार आहे.
मुंबईसहीत ठाणे आणि उपनगरांमध्ये रात्रभर पाऊसधार सुरु होती. पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मुंबई, रत्नागिरीतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी भागांत हलका पाऊस झाला.
कोकण विभागात आणखी तीन, तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस असेल.
नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे गोदावरी नदीला वर्षातला पहिला पूर आला आहे. सोमवारी दुपारपर्यंत पुराचे पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहचले होते.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के, दारणा धरण 97 टक्के, नांदूर-मधमेश्वर प्रकल्प 93, कश्यपी 73 टक्के आणि मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटी धरणे 100 टक्के भरली आहे. गंगापूर धरणातून सोमवारी (13 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता 2500 क्यसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.
पालखखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालखेड धरणातून 800 क्यूसेक्स पाणी सोमवारी (13 सप्टेंबर) आठ वाजता सोडण्यात आले. पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला पूर आला आहे.
कोयनाचे सहा दरवाजे उघडले
कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून, कृष्णा-कोयना नद्यांकाठीही सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठयात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळेच कोयना धरणाचे सहा दरवाजे 2.6 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोयना काठच्या गावांना सतर्कचे इशारा देण्यात आला. तसेच राज्यातील महत्त्वाची धरणे भरली असून पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.