पणजी – भाजपने गोव्यातील 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मात्र, दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. उत्पल यांनी ज्या पणजी विधानसभेचा आग्रह धरला होता, त्या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या 40 पैकी 34 उमदेवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, पणजीतून उत्पल पर्रिकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी फडणवीस यांना उत्पल पर्रिकरांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर, पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट देण्यात आले आहे. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे सांगतानाच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीसांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. कॉंग्रेसने अनेक वर्ष गोव्यावर राज्य केले. 2007 ते 2012 च्या सत्ता काळात कॉंग्रेसने मोठे घोटाळे केले. गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. केवळ लूटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी कॉंग्रेसला गोवा हवा आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी कॉंग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक कॉंग्रेस नेते सोडून गेले आहेत. कॉंग्रेसची विश्वासार्हता संपली आहे, अशी टीका त्यांनी केली.