पुणे – बाणेर येथील अपहरण झालेला मुलगा स्वर्णव (डुग्गू) चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेड वरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
सुनीता संतोष राठोड चव्हाण (वय 36) यांचा अपघातामध्ये नगर महामार्गावर चार चाकी अपघातात मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले व पती गंभीर जखमी झाले आहेत. समर राठोड (वय 14), अमन राठोड (वय 6) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.