अमोल मतकर
संगमनेर – एकीकडे सरकारने वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे वाड्या-वस्त्यांवरील शाळा राज्यात आदर्श कशा होतील याकडे शिक्षक गांभीर्याने लक्ष केंद्रित करून वर्षभरात एकही दिवस सुटी न घेता शिकवत असल्याचे चित्र संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावातील कानिफनाथ वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिसून येते. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांचे तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील निळवंडे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर कानिफनाथ वस्ती आहे. वस्तीवर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 35 विद्यार्थी शिक्षण घेतात. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग याठिकाणी आहेत. येथे हांडे आणि पाटोळे हे दोन शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करतात. विशेष म्हणजे त्यांनी एकही दिवस सुटी न घेता ते शिकवत असतात. एवढेच नव्हे तर सुटीच्या दिवशीसुद्धा हे जोडपे घरून ऑनलाइन पद्धतीने शिकवतात. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत नेहमी अव्वल राहिले आहेत. याचा गावकऱ्यांनादेखील तेवढाच अभिमान आहे.
कानिफनाथ वस्ती शाळेला जागा उपलब्ध नसल्याने पूर्वी ही शाळा जिथे जागा उपलब्ध होईल, तिथे भरत होती. परंतु गावातीलच प्रकाश पवार यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन शाळेसाठी चार गुंठे जागा दान दिली. त्या जागेवर शाळेचे बांधकाम होऊन शाळेची वास्तू तयार झाली आहे. पवार यांच्या दातृत्वामुळे ग्रामस्थही हिरिरीने सक्रिय सहभाग नोंदवू लागले आणि शाळेचे रूपच बदलून गेले.
सन 2018मध्ये कानिफनाथ वस्ती शाळेत अशोक हांडे व शिक्षिका संगीता पाटोळे हे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर या दोन्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार या शाळेचा कायापालट झाला.
आम्ही ज्या-ज्या शाळेत काम केले, तेथे प्रामाणिक काम केले आहे. येथे आल्यापासून आपल्या शाळेतील विद्यार्थी हे फक्त अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षेतही अव्वल राहावेत याचा नेहमी प्रयत्न केला. यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे.
– संगीता पाटोळे, शिक्षिका