नगर – जिल्ह्यात वेगाने फैलावत असलेल्या लम्पी स्किन या घातक आजाराच्या सावटात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू झाला आहे. आतापर्यंत 24 लाख 26 हजार 402 मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन त्यापासून 20 लाख 22 हजार 945 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या गाळपात श्री अंबिका शुगर हा खासगी कारखाना आघाडीवर असून या कारखान्याने आतापर्यंत 3 लाख 95 हजार मे. टन गाळप केले आहे.
जिल्ह्यात कारखान्यांचे गाळप जोरात सुरू झाले आहे. जिल्ह्यातील 22 कारखान्यांपैकी 20 कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये जवळपास 12 कारखाने सहकारी तर 8 कारखाने खासगी आहेत. काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी असल्याने अन्य कार्यक्षेत्रातील ऊस प्रथम आणून गाळप सुरू झाले आहे. गाळप हंगाम सुरू झाल्यापासून 24 लाख मेट्रीक टन ऊस गाळप करण्यात आले आहे. हा आकडा सातत्याने वाढत चालला आहे.
साखर निर्मितीत अंबिका शुगर कारखाना आघाडीवर असून या कारखान्याने आतापर्यंत 3 लाख 64 हजार 600 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दुसऱ्या क्रमांकावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना असून या कारखान्याने 2 लाख 6 हजार 740 क्विंटल साखर तयार केली आहे.
साखर उताऱ्यात “अशोक’ आघाडीवर
साखर उताऱ्यात मात्र श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा उतारा 10.87 टक्के आहे. तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा उतारा 10.15 टक्के, गंगामाई 10.9 टक्के, तर प्रसाद शुगर कारखान्याचा उतारा 9.82 टक्के आला आहे. काळे, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, कुकडी, पियुष शुगर या कारखान्यांचा उतारा 9 टक्क्यांचा आसपास आहे.