मुंबई : राज्यात मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या काही मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. तदरम्यान, कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन आणखी सुरु ठेवत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि कर्मचारी यांच्यात संघर्ष सुरु आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.
“एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी राज्य दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.” असे राज ठाकरे म्हणाले.
तसेच, “ज्या काही गोष्टी बोलायाच्या आहेत, त्या अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्यासोबतचे जे सहकारी पक्ष आहेत. या लोकांनी या गोष्टी बोलाव्यात. बाकीच्या लोकांनी बोलण्याचा विषय येत नाही. कर्मचाऱ्यांना समजून घेणं पण तितकच महत्वाचं आहे, गरजेचं आहे.
चार-चार महिने जर त्यांना पगार मिळणार नसतील, आता जे लोक कर्मचाऱ्यांबद्दल बोलत आहेत. त्यांच्या घरी दिवसाला किंवा दोन दिवसाला घरी पैसे नाही आले भ्रष्टाचारातून, तर त्यांचा जीव कासावीस होतो. या कर्मचाऱ्यांचे चार-चार महिने पगार नाही, कसं होणार? दिवाळी पगाराविना गेली. अशा परिस्थिती कर्मचारी असताना तुम्ही कसली अरेरावीची भाषा करताय?” असं देखील राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं.
याचबरोबर, “मध्यंतरी माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते आणि हा विषय सहज निघाला. या विषयात मी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवणार आहे. सध्या त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना मी ते पाठवलेलं नाही. खरंतर एसटी सारखा विषय, १९६० मध्ये एसटी महाराष्ट्रात सुरू झाली आणि एवढ्या गावागावात जाणारी वाहतुक यंत्रणा ही वाखणण्यासाठी गोष्ट आहे.
अशा परिस्थितीत जर त्या एसटी बसेसची परिस्थिती पाहिली तर त्यामधील चालक आणि अन्य कर्मचारी हे कशा परिस्थितीमधून एसटी चालवताता आणि लोकांना पोहचवत असतात. त्या एसटी मधला भ्रष्टाचार जोपर्यंत बंद होत नाही, थांबत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना काही गोष्टी मिळणार नाहीत. एसटीचं खासगीकरण करण्यापेक्षा त्याला चालवण्यासाठी एखादी व्यवस्थापन कंपनी का नेमली नाही जात? ” असंही राज ठाकरे म्हणाले.