नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत ऋषभ पंतलाच संधी द्या, अशी मागणी माजी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आशिष नेहरा यानेही समर्थन दिले आहे.
धोनीने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षाच्या खंडानंतर तो आयपीएल स्पर्धेद्वारे मैदानात परतला. मात्र, त्यापूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्याच्या जागी कोणता खेळाडू भारतीय संघात निवडला जावा यावर कवित्व सुरू झाले आहे. त्यावरच सोशल चॅटवर बोलताना बांगर यांनी आपली मते मांडली.
धोनीचा वारसदार शोधण्यात अद्याप निवड समितीला यश आलेले नाही. अखेर मर्यादित षटकांच्या सामन्यांत सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल यालाच फलंदाजीसह यष्टिरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. एखाद्या मालिकेत राहुलला ही जबाबदारी देणे ठीक आहे, पण सातत्याने हे घडले तर त्याच्या फलंदाजीवर परिणाम होण्याचा धोका आहे, असेही बांगर म्हणाले.
संघात सातत्याने स्थान मिळाल्यानंतरही पंतला आपली गुणवत्ता व कामगिरी सिद्ध करता आलेली नाही हे मान्य आहे, पण त्याला अजून संधी दिली गेली तरच त्याचा आत्मविश्वास वाढेल. सध्या संजू सॅमसन, वृद्धिमान साहासारखे यष्टिरक्षक फलंदाज संघासाटी अन्य पर्याय आहेत. मात्र, पंत हाच धोनीची जागा घेऊ शकेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
यष्टिरक्षणाचा निकष लावला तर पंत उजवा आहे. त्याने यष्टीमागे सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. केवळ त्याच्याकडून धावा झाल्या नाहीत म्हणून त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्याला आणखी संधी दिली गेली तर तो निश्चितच भरीव कामगिरी करेल. त्याच्या रूपाने संघात मधल्या फळीत एक डावखुरा फलंदाज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याच्या भारतीय संघात पंतला जास्तीतजास्त संधी दिली गेली तरच त्याला विविध सामन्यांत खेळण्याचा अनुभवही मिळेल व त्यातूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.