भारत कृषक समाजाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बारामती- राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारी भरपाईपोटी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपयांची मदत तातडीने करावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने मुख्यमंत्र्यांकडे केले आहे.
मुंबई येथे डॉ. प्रकाश मानकर व भारत गावडे पाटील यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने राज्याचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी पिक विमा मदत, पिकविमाच्या धोरणात बदल, हमी भावात वाढ, एकरी अनुदान भावांतर योजनले, प्रत्येक गावात नाला रुंदीकरण -खोलीकरण करून सिंचनक्षमता वाढविणे, अन्नधान्य भाजीपाला फळे यासाठी प्रक्रिया उद्योग, बेरोजगारांना व्यवसायासाठी मार्गदर्शन व आर्थिक मदत रोजगार हमी योजना शेतकऱ्यांच्या शेतावर राबविणे, अल्प दरात मुबलक वीजपुरवठा, शेत बांधाची मोजणी, नैसर्गिक शेतीसाठी अनुदान प्रोत्साहन योजना, गावातील शेत रस्ते पक्के बांधणे, शासकीय समितीत प्रगतिशील शेतकऱ्यांना घेणे, दरवेळेस शासकीय मदतीसाठी शेतकऱ्यांना कागदपत्रे मागण्यापेक्षा शेतकऱ्यांचे केवायसी, सातबारा आठ अ बॅंक खाते आदी एकदाच करून घ्यावे या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर, उपाध्यक्ष भारत गावडे- पाटील, वसंत महाजन, शेषराव पाटील-चिखलीकर, बाळासाहेब जाधव, रवींद्र पाटील, जे. बी. पाटील, शिवा बेलपत्रे, अनिल पोहरे, प्रदीप जाधव, माधव भारसाकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
- सुरुवातीला दुष्काळाने व त्यानंतर अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत होणे गरजेचे असतानाही दिरंगाई होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्यावी
– भारत गावडे-पाटील, उपाध्यक्ष, भारत कृषक समाज