कोल्हापूर (प्रतिनिधी) – गिरगाव (ता.करवीर) येथील तरुणाई लॉकडाऊनच्या काळात डोणी परिसरातील जिवंत झऱ्यांना पुनर्जीवन देत परिसरातील स्वच्छता केली. गावातील तरुणांनी एकत्र येत राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
गिरगावमधील डोणी परिसरात प्राचीन झरे आहेत. गावात पूर्वी पाण्याची सुविधा नव्हती. त्याकाळी गावापासून दूर सहा किमी अंतरावर डोणी नावाच्या परिसरात जिवंत झरे आढळून आले. गावकऱ्यांनी तात्पुरते दगडी बांधकाम करून नागरिकांच्या आणि जनावरांच्या पाण्याची वेगळी सोय केली. कालांतराने पाण्याची गावात सोय झाल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र राजेंद्र चव्हाण या युवकाच्या ध्यानात ही परिस्थिती आल्यानंतर त्यानी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून परिस्थिती मांडली. त्याला तरुणांनी उस्फुर्त प्रतिसाद देत स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय झाला. त्यातून शेकडो तरुणांनी एकत्र येत हे झरे स्वच्छ केले.
कधीकाळी गावाची तहान भागवणाऱ्या झऱ्यांची आठवण गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळे उद्योगधंदे बंद आहेत. अनेक जण घरीच बसून आहेत. मात्र हा सगळा वेळ गावातील तरुणांनी सत्कारणी लावला आहे. या उपक्रमात गावातील विविध तरुण, तालीम मंडळातील कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक, लहान मुले यांनी सहभाग घेतला.