नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने अदाणी प्रकरणावरून भाजपाला लक्ष्य करत आहेत. शनिवारी त्यांनी एक कार्ड ट्वीट करत भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासह त्यांच्या पक्षाला रामराम ठोकलेल्या पाच नेत्यांचाही समाचार घेतला होता. दरम्यान, राहुल गांधी यांच्या ट्वीटला आता गुलाम नबी आझाद यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी हे उत्तर देत असताना राहुल गांधी यांचे विदेशात ‘नको’ त्या उद्योगपतींशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती दिली.
राहुल गांधी यांनी एक पझल कार्ड ट्वीट केले होते. या कार्डमध्ये गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस सोडून गेलेल्या पाच नेत्यांची नावं होती. या नावाममध्ये नावांमध्ये अदाणी हे नाव कसं लपलं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला होता. तसेच लोक सत्य लपवतात म्हणूनच रोज लोकांची दिशाभूल करतात. अदाणींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुणाचे आहेत? असा थेट सवाल देखील त्यांनी विचारला होता.
सच्चाई छुपाते हैं, इसलिए रोज़ भटकाते हैं!
सवाल वही है – अडानी की कंपनियों में ₹20,000 करोड़ बेनामी पैसे किसके हैं? pic.twitter.com/AiL1iYPjcx
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 8, 2023
दरम्यान, राहुल गांधी यांच्या ट्वीटला गुलाम नबी आझाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आझाद यांनी बोलताना, “राहुल गांधी आणि गांधी परिवाराचे विदेशातील विदेशातील नको त्या उद्योपतींसी संबंध आहेत. मी याची १० उदाहरणं देऊ शकतो. विदेशात ते कोणाला भेटायला जातात, हे आम्हाला माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तसेच पुढे त्यांनी, “भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांना प्रभाव वाढला, असं म्हणतात. मात्र, मला असं वाटत नाही. कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले तेव्हा त्यांच्याबरोबर एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता.” तसेच अनिल अॅंटोनी यांच्या काँग्रेस सोडण्यावरूनही त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. “देशातील तरुण वर्ग राहुल गांधी यांच्यावर नाराज आहे. त्यांच्याकडे दुरदृष्टी नाही. त्यामुळेच अनिल अॅंटोनी यांच्या सारखे तरुण नेते काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत”, असे ते म्हणाले.