पुणे – तब्बल चार महिन्यांपासून महापालिकेची सर्व उद्याने “लॉक’ आहेत. त्यामुळे महापालिकेचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळी सुट्टीतच करोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व प्रमुख उद्याने बंद ठेवण्यात आली. त्याचा फटका उत्पन्नाला बसला आहे.
शहरात महापालिकेची दोनशेंहून अधिक उद्याने आहेत. त्यातील कात्रज येथील भारतरत्न राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, पेशवे उद्यानातील साहसी खेळ आणि फुलराणी, कात्रज तलाव परिसरातील फुलराणी तसेच संभाजी उद्यानातील मत्स्यालय, सहकारनगर मधील फोर-डी आणि सात आश्चर्य उद्यान, वडगावशेरी येथील बुलेट ट्रेन असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, औंध मधील ग्रामीण संस्कृत्तीचे दर्शन घडविणारे निह्मण उद्यान, सिंहगड रस्त्यावरील पु.ल. देशपांडे उद्यान ही उन्हाळी सुट्टीत गर्दीने भरलेली असतात.
मात्र, यावर्षी मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन असल्याने सर्व उद्यानांना टाळे लावण्यात आले. तर, ही उद्याने आणखी काही महिने सुरू होण्याची शक्यता नाही. उन्हाळ्याच्या चार महिन्यांत उद्यान विभागास वर्षभरातील सर्वाधिक म्हणजे 1 ते सव्वा कोटी रुपयांवर उत्पन्न मिळते. तर या वर्षी पालिकेने अनेक उद्यानांचे प्रवेश शुल्क दुपटीने वाढवले होते. त्यामुळे या उत्पन्नात आणखी भर पडणार होती. मात्र, करोना संकटामुळे पालिकेस यंदा या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
उद्याने दिवाळीनंतरच सुरू होणार?
देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली, तरी उद्यानांमध्ये होणारी गर्दी करोनाची साथ वाढण्यास पोषक ठरणार आहे. त्यामुळे उद्यानांना अजूनही कुलूपच आहे. अनलॉक-1 मध्ये उद्याने काही दिवस सुरू करण्यात आली होती. मात्र, तेथे सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जात नव्हते. त्यामुळे ती पुन्हा बंद करण्यात आली. शहरातील करोना स्थिती सुधारण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरच उद्याने उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.