येरवडा, दि. 14 (प्रतिनिधी) -ताडीवाला भागाला मागील अनेक महिन्यांपासुन कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. पाइपलाइनला कुठेही गळती नसताना पाणी कमी दाबाने का येते, हे शोधण्यासाठी पाइपलाइनचे जॉइन्ट उघडल्यावर यामध्ये पोते, बूट, लाकडं-काठ्या, बाटल्या, खराटा आदि वस्तू अडकल्याचे निदर्शनास आले. हा सगळा कचरा काढण्यात आल्याने पूर्णदाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे.
ताडीवाला रोड परिसरातील सोसायटी, विनायकनगरी, रिवरेन सोसायटी, एकता नगर, स्वीपर चाळ, नदी किनारी परिसर आणि शूरवीर मंडल परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या, आंदोलने, मोर्चे तसेच अधिकाऱ्यांना घेरावही घातला गेला. त्यामुळे सजनाबाई भंडारी शाळा येथील चौकात पाइपलाइनची तपासणी करण्यात आली, जॉइन्टमध्ये उघडल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात कचरा निघाला. आरटीओ ऑफिसजवळ काही महिन्यांपूर्वी मेट्रोच्या कामात पाण्याची लाइन तुटली होती.त्यावेळी यावस्तू पाइपलाइनमध्ये गेल्या असतील, असे पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सागर शिंदे यांनी सांगितले.
ताडीवाला भागात कमी दाबाने पाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल वारंवार सांगितले होते. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा सापडतो ही गंभीर बाब असून पाणी पुरवठा विभागाने किती दुर्लक्ष असते, हे यातून दिसून येते. – महेबुब नदाफ, सामजिक कार्यकर्ते