प्रभात वृत्तसेवा
पुणे – नऊ दिवस जल्लोषात साजरा झालेल्या गणेशोत्सवानंतर शुक्रवारी “पुनरागमनायच!’ अर्थात “पुढच्या वर्षी लवकर’ या असे म्हणत बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सर्व पातळ्यांवर सुरू करण्यात आली आहे.
ज्या पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, त्या पुण्याचे वैभव असलेल्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे. प्रथेप्रमाणे मानाचे पाच गणपती उत्सव मंडपातून मंडईतील टिळक पुतळ्याजवळ येतील आणि तेथे पूजन होऊन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
मानाच्या गणपतींची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून जाते. त्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतरच त्या मार्गावरून अन्य गणपतींची मिरवणूक सुरू होते. मानाचे चार गणपती लक्ष्मी रस्त्यावरून, तर पाचवा केसरीवाड्याचा गणपती हा टिळक रस्त्यावरून अलका टॉकीज चौकात येतो. त्यानंतर त्या रस्त्यांवरून अन्य मंडळाच्या मिरवणुकांना परवानगी दिली जाते.
गेल्या दोन वर्षांत करोनाने थैमान घातले होते. त्यामुळे गणेशोत्सवही निर्बंधात अडकला होता. यंदा तो निर्बंधातून मुक्त झाला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली असून, यंदा हा उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. नऊ दिवसांत काही दिवस पावसाचा अडथळा सोडला तर कोणतेच विघ्न आले नाही.
मिरवणूक मार्गावर महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. याशिवाय गुरुवारीच अनेक मंडळांनी विसर्जन रांगेत आपले रथ आणून ठेवले आहेत. याशिवाय ज्या रथातून बाप्पांची मिरवणूक निघणार त्याची सजावटही अनेक मंडळांची पूर्ण झाली आहे.
मानाच्या गणपतींशिवाय पुण्यात आकर्षणाचे असलेले दगडूशेठ, भाऊ रंगारी, मंडई, बाबू गेनू या गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूकही पाहण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे त्यांनीही विसर्जन रथ तयार ठेवले असून, ते यंदाही आकर्षणाचे विषय ठरणार आहेत.
सार्वजनिक मंडळांबरोबरच मोठ्या प्रमाणात घरगुती बाप्पांचेही विसर्जन होते. त्यासाठी महापालिकेने विसर्जनासाठी हौद, मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून दिले आहेत.