श्रीकांत विष्णू शेटे
कोणत्याही गोष्टीचा आरंभ होतो, त्यावेळी तिच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे. शक्ती आहे, हे लोकांना सांगूनसुध्दा उमजत नाही. काळ पुढं पुढं सरकत जातो, तसतशी ती गोष्ट टिकवण्यासाठीची सातत्याची आवश्यकता भासायला लागते. ती गोष्ट नुसती टिकवायचीच नाही तर वैभवाच्या शिखरावर न्यायची असेल तर नुसतं सातत्य उपयोगाचं नसतं, आपल्या संकल्पना अतिशय चांगल्या स्पष्ट असाव्या लागतात, उत्तम योजनाबद्धता असावी लागते, चिंतन लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाचं सहकार्य असावं लागतं. बुद्धीप्रामाण्यवादाला कल्पकतेची, सृजनाची उत्तम जोड मिळते, तेव्हांच सार्वजनिक गणेशोत्सवासारख्या राष्ट्रीय उत्सवाचा जन्म होतो..
पार्थिव गणपतीचं आगमन, पूजन आणि विसर्जन ही मुळातच आपली धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. अर्थातच, तिला एक वेगळं वैचारिक अधिष्ठानसुद्धा आहेच. कारण, भारतीय संस्कृतीची रचना अत्यंत भक्कम अशा वैज्ञानिक पायावर आधारलेली आहे, हे अवघ्या जगानं कधीच मान्य केलं आहे. गणपती ही देवता, तिचं सामर्थ्य, तिची व्याप्ती, तिला असलेला अग्रपूजेचा मान, तिचं देवांचा सेनापती असणं, त्रासदायक ठरणाऱ्या अनेक राक्षसांना तिचं ताडन करणं हे सगळं आपल्याला गणपतीच्या गोष्टींमधून माहिती असतं.
पण शक्ती, बुद्धी आणि प्रतिभेची देवता असलेल्या गणपतीला जनजागृती आणि सामाजिक एकसंधतेचं राष्ट्रीय प्रतीक म्हणून समाजासमोर आणायचं, हे आव्हान अतिशय क्लिष्ट होतं. तत्कालीन भारताची ब्रिटिश पारतंत्र्यातली अवस्था, विखुरलेला समाज, आणि त्या समाजाला अत्यंत आवश्यक असणारी संपूर्ण स्वातंत्र्याची प्रेरणा या महत्त्वाच्या समस्येचा सखोल अभ्यास लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी, कृष्णाजी काशिनाथ खासगीवाले, गणेश नारायण घोटवडेकर, गणपतराव सोहोनी
त्यांच्या सहकाऱ्यांनी निश्चित केलेला असणार “आज मनात आलं आणि लगेच उत्सव सुरु केला” असं नक्कीच झालेलं नसणार. त्यामागे खूप मोठं विचारमंथन असणार.
व्याख्यानं हे गणेशोत्सवाचं महत्वाचं अंग होतं. सामाजिक एकता, जागृती, लोकशिक्षण याचं गणेशोत्सव हे माध्यम बनलं होतं. त्यामुळे, स्वातंत्र्य चळवळीतलं सार्वजनिक गणेशोत्सवाचं योगदान हा न दुर्लक्षण्याजोगा मुद्दा आहे. स्वातंत्र्य चळवळ अधिक दृढ व्हावी, यासाठी लोकमान्य टिळक, त्यांचे सहकारी, नेते, विचारवंत केवळ पुण्यातच नव्हें तर देशभर व्याख्यानं देत समाजात सुरु असलेल्या असामाजिक गोष्टी, चुकीच्या प्रथा यांच्याबाबत जागृती व्याख्यानातून केली जात असे.
टिळकांचं संघटन कौशल्य हा निःसंशय विद्वत्तेचा आविष्कार होता. १९०८ पर्यंत स्वतः लोकमान्य या उत्सवात लक्ष घालत, पण त्यांना शिक्षा झाल्यानंतर उत्सवाच्या नियोजनासाठी गणेश मंडळ स्थापन करण्यात आलं. साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. यावेळी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, त्या काळातले कसबा गणपतीच्या उत्सवाचे प्रमुख असलेल्या रामचंद्र गोविंद दंडवते आणि गोविंद धोंडदेव दंडवते यांचा. कित्येक दशकं त्यांनी या मंडळाची धुरा वाहिली आहे. दोघांनीही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची पूर्ण व्यवस्था जवळपास ६० वर्षे पाहिली. काशिनाथ ठकुजी जाधव, कृष्णशास्त्री कवडे हे विसर्जन मिरवणुकीत स्वतः फिरुन उत्सवाची सांगता व्यवस्थित होईल याची काळजी घेत असत. या मंडळींनी व्यवस्थापन शास्त्राचं शिक्षण घेतलं होतं का? की, या कामासाठी त्यांना भरभक्कम मानधन मिळत होतं? मुळीच नाही. अत्यंत निर्मळ मनानं, निस्पृह वृत्तीनं आणि करारी शिस्तीनं या मंडळींनी हा उत्सव पुढे नेला. याच नव्हें तर अशा अनेकांचं अविस्मरणीय योगदान सार्वजनिक गणेशोत्सव समृद्ध करण्यात आहे. तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांमधून कार्यकर्ता घडवण्याची मूस म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव
१८९३ साली पुण्यात पहिल्यांदाच तीन गणपती सार्वजनिक रित्या बसवण्यात आले आणि तिन्हीं गणपतींची विसर्जन मिरवणूक देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकत्रित काढण्यात आली, तीच पुण्याची पहिली सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक. पुढच्याच वर्षी प्रेरणा घेऊन १०० सार्वजनिक गणपती बसवण्यात आले. पण विसर्जन मिरवणुकीचे पूर्ण नियोजन कार्यकर्तेच करत असत. स्वयंप्रेरणेनं आणि उदात्त ध्येयानं प्रेरित झालेले कार्यकर्ते हे फार मोठं बळ होतं. हीच उत्तम विचारांची आणि सामाजिक उत्तरदायित्वाची शक्ती आहे.
उत्सवात आणि मिरवणुकीत मेळे सहभागी होत असत. मेळ्यांमधून निरनिराळी देशभक्तीपर पदे गायली जात. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असे. सुरुवातीला सार्वजनिक गणेशोत्सवाला विरोध करणारीही मंडळी होतीच. पण टिळकांना झालेली अटक, प्लेगचं थैमान अशा संकटकाळातही उत्सव अव्याहत सुरू राहिला आणि अधिकाधिक विचारप्रवर्तक झाला, तेव्हां हा विरोध मावळत गेला. राष्ट्रीयत्व, जनजागृती आणि देशभक्ती यांचं दर्शन मिरवणुकीत व्हायला लागलं तेव्हा, ब्रिटिश सरकारनं उत्सवावर निर्बंध घालायला सुरुवात केली. राष्ट्रीय ऐक्य, देशप्रेम, जनजागृती यांचा प्रसार होऊ नये म्हणून भाषणं, मेळे, राष्ट्रपुरुषांच्या तसबिरी लावणं यांवर बंदी घालण्यात आली होती. वादन करायचं नाही, कीर्तन प्रवचन करायचं नाही, देशभक्तीपर घोषणा द्यायच्या नाहीत, भगव्या पताका किंवा झेंडे आणायचे नाहीत, असे निर्बंध ब्रिटिशांनी लादले. मर्दानी खेळांच्या प्रयोगावर बंदी आणली गेली, मिरवणुकीत लाठ्या काठ्या आणण्यावर निर्बंध लादले गेले. पण लोकमान्यांनी चक्क उसाला भगव्या पताका बांधल्या आणि मिरवणुकीत आणल्या.
कोणत्याही गणेशोत्सव कार्यकर्त्यानं स्वतःला कधीही विसर पडू देऊ नये अशी एक ऐतिहासिक वस्तुस्थिती सांगतो. १९२१ साली परदेशी कपड्यांवर बहिष्कार आणि मद्यपान निषेध’ हा कार्यक्रम मिरवणुकीच्या समारोप समारंभाच्या व्याख्यानात सर्वांना देण्यात आला. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीला सार्वजनिक गणेशोत्सवाशी कसं घट्ट जोडण्यात आलं होतं, हे यातून दिसतं
१९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि व्याख्यानं, मेळे यांचं प्रमाण हळूहळू कमी होत होत बंद झालं. सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक रुप असणाऱ्या उत्सवानं रोषणाई, आरास असं सौंदर्यपूर्ण कलात्मक रूप घेण्यास सुरुवात केली. विविध मंडळे सांगीतिक कार्यक्रम, लहान मुलांचे विविध गुणदर्शन, गणेशयाग, सत्यविनायक पूजा असे कार्यक्रम आयोजित करत असत. आजही कित्येक मंडळांमध्ये हे कार्यक्रम सुरु आहेत. एकूणच, काळानुरूप सार्वजनिक गणेशोत्सव खूपच बदलत गेला आहे, हे खरं.
या उत्सवाची कित्येक चांगली गुणवैशिष्ट्यं असली, तरीही आजकाल चर्चा होते ती फक्त विसर्जन मिरवणुकीचीच..! विसर्जन मिरवणूक हे वैशिष्ट्य आहेच, पण केवळ तेच एकमेव साध्य नाही, खरंतर, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव आहे आणि समाजप्रबोधन हा त्याचा पाया आहे. आज समाजाला प्रबोधनाची आवश्यकताच नाही का? समाज पूर्ण सूज्ञ आणि विवेकी झाला आहे का? अजून ते उद्दिष्ट आपण साध्य केलेलं नाही. त्याला वेळ लागणार आहे. म्हणूनच, गणेशोत्सवाचा समाजप्रबोधनाचा पाया तसाच असणं ही आपल्या सर्वांचीच गरज आहे.
कधीकाळी रात्री आठाच्या सुमारास विसर्जनाची मिरवणूक संपत होती, हे जर आजच्या युवा पिढीला सांगितलं तर, ‘आजि म्यां ब्रह्म पाहिले’ अशी त्यांची अवस्था होईल. कुणाचा विश्वासच बसणार नाही. कारण, विसर्जनाची मिरवणूक दीड दिवस चालणार, हे आपल्याला अगदी स्वाभाविक वाटायला लागलं आहे. पण, मी अगर्दी अभिमानानं सांगतो की, माझ्या लहानपणापासून मी पाहिलेली श्री कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात येण्यासाठी कधीही दुपारच्या साडेतीनचा ठोका चुकलेला नाही. लक्ष्मीरस्त्यावर कोणत्या चौकात मिरवणूक किती वाजता आली पाहिजे, याच काटेकोर वेळापत्रक तयार करणारं पहिलं मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ..! आणि हीच प्रथा गेली कित्येक वर्ष सुरु आहे.
“प्रमाणामध्ये सर्व काही असावे” असं एक संतवचन आहे. ते आपण सर्वांनीच समजून घ्यायला हवं आणि आचरणात आणायला हवं. उत्सवात सगळ्या प्रकारची मंडळी सहभागी होतात. तरुण वर्ग तर असतोच, पण अगदी लहान मुलं असतात, तसे जेष्ठ नागरिकही असतात. कुणी देखावे पाहण्यासाठी आलेले असतात, कुणी सजावट पाहण्यासाठी आलेले असतात, कुणी गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेले असतात.
हुल्लडबाजी, टिंगलटवाळी, रस्त्यांवरून मोठमोठ्यानं कर्णकर्कश आवाजाच्या पिपाण्या वाजवत फिरणं, कसले कसले चित्र विचित्र मुखवटे चेहऱ्याला लावून फिरणं, हे प्रकार नोंद घेण्याइतपत वाढलेले असतात. हा अतिरेक नव्हे का? सगळीच मंडळे सिनेमाची विचित्र किंवा द्वैयर्थी गाणी लावतात, असं नाही. पण ते प्रमाण जाणवण्याइतपत वाढलेलं आहे, हे तरी कसं नाकारता येईल? मोठमोठाले प्रखर लाइट्स, स्पिकर्सच्या मोठमोठ्या अवाढव्य भिंती, बीभत्स गाणी यांची गणेशोत्सवाला खरोखरच गरज आहे का? याचा विचार गांभीर्यानं करणं आता अपरिहार्य झालं आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव म्हणजे ताळतंत्र सोडलेला उत्सव नव्हे, अनेकांना गणेशोत्सवादरम्यान केले गेलेले नियम जाचक वाटतात. पण समाजातल्या लहानमोठ्या प्रत्येक घटकानं अतिरेक टाळला तर सगळेच प्रश्न कमी होतील.
सार्वजनिक गणेशोत्सवानं अनेक गोष्टी कालानुरूप अंगिकारल्या आहेत आणि त्या पाळल्या आहेत. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गुलालमुक्त विसर्जन मिरवणूक. एक काळ असा होता की, केवळ लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत १०० मण गुलाल उधळला जात असे. सुरुवातीच्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांवर देखील इतका गुलाल उधळला गेला होता की, ते ओळखूच येत नव्हते, अशी नोंद आहे. पण काळ बदलला आणि मिरवणूक गुलालमुक्त होण्याचा संकल्प प्रत्यक्षात आला. वरवर पाहता हा अगदी छोटासा बदल वाटत असला तरीही तो गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा होता, हे १००% सत्य आहे. गुलाल बंद करण्याचा निर्णय ४० वर्षापूर्वी घेऊन तो काटेकोरपणे आणि ठामपणे अंमलात आणणारं पहिलं मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती मंडळ..!
पुर्ण विस्तारायला लागलं तसतशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या, घरगुती गणपतींची संख्या, रहिवासी सोसायट्यांमधली गणपतींची संख्या वाढायला लागली.
साहजिकच, लाखांच्या वर गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यामुळे पुण्याच्या नदीच स्वास्थ्य चिंताजनक झालं. अशावेळी, पुढचा पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता स्वच्छ पाण्याच्या हौदात विसर्जित करण्याचा धाडसी पण दूरगामी निर्णय घेतला तो श्री कसबा गणपती मंडळानंच..! या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन अन्य प्रमुख मंडळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला अन् गणेशमूर्तीचं नदीपात्रात विसर्जन करणं थांबवलं.
कितीतरी गोष्टी केवळ आरंभशूर होऊन तेवढ्यापुरत्याच केल्या जातात, एका दिवसापुरती प्रसिद्धी मिळते, चर्चा होतात आणि तात्कालिक लाभ झाला की, ती गोष्ट बंद होते. पण आमचं तसं नाही. महिलांचा सन्मान आणि त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवातला सहभाग अधिक प्रभावी व्हावा, याकरिता आम्हीं स्वतंत्र नियोजन करायचं ठरवलं आणि गेली ३५ वर्ष आम्हीं सार्वजनिक गणेशोत्सवात महिला दिन करत आहोत. या दिवशी संपूर्ण दिवसभर पूजा, आरतीपासून ते भाविकांच्या व्यवस्थेपर्यंतच्या इत्यंभूत जबाबदाऱ्या आमच्या मंडळाच्या महिला कार्यकर्त्या सांभाळतात. हा निर्णय घेणारं पहिलं मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती मंडळ..!
इतकंच नव्हे तर, २०१५ पासून आमच्या विश्वस्त मंडळात महिला सदस्यांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला, आणि तो तात्काळ अंमलातही आणला गेला. महिला सदस्यांची विश्वस्तपदी नियुक्ती करणारं पहिलं मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती मंडळ..! हे सगळं तुमच्यासमोर उलगडून दाखवताना मला कणभरही आत्माभिमान वाटत नाही, पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अतिशय अभिमान मात्र निश्चित वाटतो. आपण नेमके कोणत्या परंपरेचे पाईक आहोत आणि ती परंपरा किती । कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांनी नावारुपाला आणली आहे, ह्याची जाणीव मनात नेहमी जागी ठेवली की, चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत राहते.
आता आपला सार्वजनिक गणेशोत्सव एका वळणावर येऊन ठेपला आहे. समाजातल्या एका मोठ्या वर्गाला पुन्हा एकदा मंगलमय मिरणुकीची अपेक्षा आहे, असं वाटायला लागलं आहे. त्यांनाही सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी व्हायचं आहे, पण इव्हेंटमध्ये नाही. गणेशोत्सव हा उत्सव आहे की त्याचा इव्हेंट झाला आहे, यावर निश्चितच पुनर्विचार झाला पाहिजे आणि तो विचार कार्यकर्त्यांनीच केला पाहिजे. ज्या रहिवासी भागातून मिरवणुकांचे मार्ग जातात, तेथून मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी तरी रहिवासी नागरिकांचा विचार करणं क्रमप्राप्त आहे.
कोलमडणारं नियोजन आणि मूलभूत सुविधांमधला ढिसाळपणा हे दोन मोठे प्रश्न आहेत. मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी दहा दिवसांमध्ये अक्षरशः कोट्यवधी लोक येतात. परगावांहून सुध्दा हजारोंच्या संख्येनं भाविक येतात. पण वर्षानुवर्षाचा अनुभव असूनही पुरेशी स्वच्छतागृहे नसतात, ही खेदजनक वस्तुस्थिती आहे. स्वच्छतागृहांच्या अभावी दहा दिवसांमध्ये रस्त्यांची, बोळांची जी अवस्था होते, जी दुर्गंधी सुटते, ती खरोखरच लाज आणणारी आहे. प्रशासनानं पुरेशी किंबहुना जास्तच स्वच्छतागृहे उपलब्ध करुन दिली तर मोठी सोय होईल.
भाविकांची गर्दी वाढते आहे, तसा व्यवस्थेवर ताण येणारच, हे उघड आहे. म्हणूनच तर प्रत्येक कार्यकर्ता अधिक सजग आणि जागरुक व्हायला हवा. केवळ भव्यदिव्य दणदणीत मिरवणूक आणि त्यासाठीच अवाढव्य खर्च हे चित्र बदलायला हवं. कारण, आपण कार्यकर्त्यांनीच ते बदललं नाही तर निर्बंध येतच राहतील. भाविकांना देखणा उत्सव दिसत असला तरीही, त्यामागे हजारो कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं असतं, अपार कष्ट केलेले असतात. मंडळ कोणतंही असलं तरी प्रत्येकावर जबाबदारी असतेच आणि ती संपूर्ण उत्सव पार पडेपर्यंत निभावून न्यायची असते. अशा वेळी स्थानिक प्रशासनानं सहकार्य वाढवलं तर उत्सव अधिक मंगलमय होईल.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा आधारस्तंभ म्हणजे प्रत्येक समर्पित कार्यकर्ता. अगदी लहानपणापासून मंडळाशी जोडली गेलेली मुलंमुली मोठी होतात, तेव्हा कॉलेजेस, नोकऱ्या, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं सगळं सांभाळून मंडळाचं काम करतात. आपल्याला ते बऱ्याचदा केवळ गणपती उत्सवाच्या दहा दिवसांमध्येच दिसत असले तरी, ते वर्षभर सक्रिय असतात. समाजापुढं उभ्या ठाकलेल्या कित्येक अडचणीच्या वेळी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अखंड आपत्कालीन मदतकार्य केलेलं आहे..
अगदी उल्लेखच करायचा झाला तर २००९ सालच्या उत्सवाचा करता येईल. “स्वाईन फ्ल्यू” च्या भीतीदायक वातावरणातच उत्सव सुरु झाला. पण कार्यकर्त्यांच्या सामाजिक भानाचं अतिशय कौतुकास्पद दर्शन त्यावर्षी घडलं, बहुतांश मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी देखावे उभारले नाहीत, मिरवणुका रद्द केल्या, गुलालाचा वापर पूर्ण बंद केला आणि विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी नागरिकांना मास्क चं वाटप देखील केलं. काही मंडळे हातरुमालांवर निलगिरीचे थेंब टाकून त्याचे वाटप करत होती. कार्यकर्त्यांच्या मनातली समाजाबद्दलची भावना काय आहे, याची प्रचिती तेव्हां आली.
आव्हानात्मक काळ होता तो कोविडचा, यावेळी, कार्यकर्त्यांनी जे काम केलंय, त्याचं दुसरा खरोखरच वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. अन्नदान सेवा, रुग्णवाहिका सेवा, औषधं वाटप, मास्क वाटप अशी कित्येक कामं कार्यकर्त्यांनी स्वतःहून स्वीकारली आणि चोख बजावली. प्रशासनाला, आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य केलं. कार्यकर्त्यांनीच आधुनिक तंत्रज्ञान गणेशोत्सवात आणलं आणि भाविकांना घरात बसूनच दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली. सगळ्यात कठीण काम होतं ते रहिवासी भागांमध्ये सॅनिटायझेशन करण्याचं. पण कार्यकर्त्यांनी तेही केलं. किती ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे हात या कार्याला लागले, त्याची गणती नाही. पण खरोखरच वैशिष्ट्य असं की, यांच्यापैकी कुणालाही ह्याचं कणभरसुध्दा श्रेय नकोय. कार्यकर्ता म्हणून आपलं ते कर्तव्यच आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. हेच तर सार्वजनिक गणेशोत्सवाचं पुण्यफल आहे.
पण आता परिस्थिती वेगानं बदलतेय. समाजाची लोकसंख्या वाढत असली तरीही, कुटुंबांची पूर्वी भक्कम असलेली बांधणी आता कमकुवत होत चालली आहे. माणसांचा मानसिक भावनिक ताण वाढतोय. का बरं? कारण, समर्पणाचा भाव आणि स्वार्थ यांच्यातला फरक ओळखून त्यानुसार वागणं माणसांना जमतच नाहीय. “हम भी अब कुछ देना सिखें” हे तत्त्व समजून घ्यायला हवं. कार्यकर्त्यानं त्याचं समाजभान अभ्यासानं आणि प्रत्यक्ष कामातून वाढवलं पाहिजे, समाजाच्या विविध स्तरांतून माणसं जोडली पाहिजेत. चांगल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक केलं पाहिजे, पण अनुचित गोष्टींना ठामपणे कडाडून विरोधही केला पाहिजे. हीच कार्यकर्त्याची भूमिका आगामी काळात अत्यंत महत्वाची ठरणार आहे. गणेशोत्सव हा आपल्या प्रत्येकाचा आहे, तसाच तो समाजाचाही आहे.
उत्सव आता मोठा होतोय, भविष्यातही तो आणखी मोठा होतच जाणार. म्हणूनच, अधिक विचारी, समंजस, भावनिकदृष्ट्या समृद्ध शिस्तबद्ध आणि तितक्याच तळमळीच्या कार्यकर्त्यांचं मोठं संघटन होणं, ही आपली गरज आहे. विविध क्षेत्रांमध्ये चांगलं काम करणारी माणसं मोठ्या संख्येनं समाजात आहेत. अनेकजण विविध क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ आहेत. अशा तरुणांची संख्याही मोठी आहे. ह्यांना आपल्याशी जोडून घेता येईल का? ह्याचा विचार करायला हवा. हाच आपला विचार गणेशोत्सवाला अधिक प्रभावी आणि समृद्ध करेल.
स्वातंत्र्यपूर्व काळातला उत्सव आणि आजचा उत्सव यांत एक मोठा फरक आहे. तो आहे उद्दिष्टांचा, समाजसंघटन हा उद्देश स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संपुष्टात आला असला तरी, अन्य उद्दिष्टं तशीच आहेत. पर्यावरण जतन संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, युवा पिढीची जडणघडण, रोजगारवृद्धी, विद्यार्थी विकास अशी कितीतरी उद्दिष्टं नव्यानं घेता येतील. त्यासाठी आपली शक्ती बुद्धी कामी लावता येईल. समाजाला पूर्वीही सकारात्मक परिवर्तनाची गरज होती आणि आजही ती आहे, हे महत्त्वाचं सूत्र प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःच्या मनावर ठसवलं तर, आपला उत्सव गणरायासारखाच सर्वांगसुंदर होईल, याची मला खात्री आहे.
श्रीकांत विष्णू शेटे, अध्यक्ष,
मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे