नवी दिल्ली -इंधन दरवाढीचे पडसाद सोमवारी पुन्हा लोकसभेत उमटले. इंधन दरवाढ मागे घ्यावी. संबंधित मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली.
कॉंग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. दरवाढीमुळे खिशांची लूट होत असल्याने सामान्य जनता त्रस्त बनली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन दरवाढ होत असल्याचे सरकार म्हणते. मात्र, ते खरे नाही. आपण रशियाकडून केवळ 0.50 टक्का कच्चे इंधन आयात करतो.
आताच्या सरकारने सुमारे 8 वर्षांत पेट्रोल आणि डीझेलवरील उत्पादन शुल्कातून तब्बल 26 लाख कोटी रूपये कमावले. अच्छे दिन आणल्याचे सरकार सांगते. प्रत्यक्षात आता इतके बुरे दिन सामान्य जनतेसाठी असू शकत नाहीत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
इतर काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला धारेवर धरले. संसदेत आणि संसदेबाहेरही इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे.