वंदना बर्वे
नवी दिल्ली – पाच राज्यात झालेला पराभव कॉंग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून कॉंग्रेसने संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. स्वतः सोनिया गांधी यांनी पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून नेत्यांना संघटन मजबूत करण्यासाठी विश्वासपात्र नेत्यांचे एकत्रिकरण करायला सुरुवात केली आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कॉंग्रेस संघटनेत मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रियेची तयारी सुरू आहे. येत्या 15 दिवसांत मोठे बदल केले जाऊ शकतात. या अंतर्गत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये नवीन पीसीसी प्रमुख नेमले जातील. याशिवाय काही राज्यांमध्ये सरचिटणीस आणि सचिवांची हकालपट्टी होऊ शकते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या यादीत समाविष्ट असलेल्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह इतर सर्व राज्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी कॉंग्रेस हायकमांडच्या पातळीवर नव्या रणनीतीवर काम सुरू आहे. यात प्रामुख्याने प्रत्येक राज्यातील संघटनेतील नेत्यांमधील संघर्ष दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आला आहे.
पंजाब आणि उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचा ज्या प्रकारे पराभव झाला आहे, त्याचे सर्वात मोठे कारण संघटनेतील संघर्ष असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीतील राज्यांमध्ये ही घटना पुन्हा घडू नये, यासाठी पक्षश्रेष्ठींना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर कॉंग्रेसमधील नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई नसेल असे क्वचितच राज्य असेल. याचा सर्वाधिक फटका कॉंग्रेसला बसला आहे.