नगर – सध्या घावूक बाजारात फळभाज्या महाग विकल्या जात आहेत. अनेक फळभाज्या 80 ते 100 रुपये किलोने विकल्या जात आहेत. फळभाज्यांची दरवाढ गृहिणींच्या आवाक्या बाहेर आहे. सध्या फळभाज्यांचे दर वाढले असून टोमॅटा, वांगे, भेंडी, गवार, शेवगा, दोडका यांचे भाव वाढले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पालेभाज्या लावल्यानंतर या पालेभाज्या आता बाजारात आल्या असून त्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, फळभाज्यांचे दर जास्त आहेत. शेपू, मेथी, पालक या भाज्यांची एक जुडी 10 ते 15 रुपयांना किरकोळ बाजारात विकली जात आहे. तसेच किरकोळ बाजारात पालेभाज्यांची दर कमी असले तरी फळभाज्यांचे दर मात्र कमी झालेले नाहीत. गेल्या आठवड्यात 40 रुपये किलो असलेल्या वांगेची आवक कमी झाल्याने वांग्याचे भाव वाढले असून, किरकोळ बाजारात वांगी 50 रुपये किलो विकली जात आहेत. दोडका 70 रूपये किलो मिळत आहे.
श्रावण घेवडा व गवारचे भाव सत्तरीच्या पार किलोपर्यंत गेले आहेत. कारले, भेंडी, प्लॉवर या भाज्यांचे भाव 60 रुपये किलो आहे. हिरव्या मिरचीचा दर मात्र कमी झाला आहे. गेल्या महिन्यात हिरवी मिरची 80 रुपये किलोने विकली जात होती. आता दर कमी झाल्याने हिरवी मिरची 60 रुपये किलोने विकली जात आहे.
कांदा-लसणाचे दर वाढताहेत
गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर वाढत आहेत. किरकोळ बाजारात चांगला कांदा 70 रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या आठवड्यात कांदा 60 रुपये किलोने विकला जात होता. आठवडाभरात एक किलो कांद्याच्या भावात दहा रुपयांनी वाढ झाली असून सध्या बाजारात लसूनच्या भावात देखील वाढ झाली आहे. घाऊक बाजारात लसून 50 रूपये पाव आहे.