एकदा पुण्याला एका मैत्रिणीकडे गेले होते. तिचा मुलगा आणि सून सकाळीच नोकरीला गेले. ती आणि तिचा नातू समीर घरीच होते. “समीर, बघ आपल्याकडे कोण आलयं?’ नातू झोपेतून उठून आल्यावर मैत्रीण त्याला सांगू लागली. “आजी आहे ही. से गुड मॉर्निंग टू हर?’ समीरने माझ्याकडं टक लावून पाहिलं. मैत्रिणीनं कौतुकानं त्याच्याकडं आणि मग माझ्याकडं पाहिलं. मग त्याचा नाश्ता, अंघोळ, ब्रश करणे सगळ्या गोष्टी करत असताना तिचं त्याला शिकवणं चालूच होतं. हातात ब्रश दिल्याबरोबर “व्हॉट इस धिस?, व्हेअर आर युवर टीथ?’ नंतर त्याने बॅटबॉल आणला व आजीला खेळायचा आग्रह करू लागला. आजी परत सुरू…
“कितवीत जातो गं हा?’, मी विचारलं.
“अग प्ले स्कूलला जातो. शाळा खूप चांगली आहे. तीन मजली इमारत आहे. सगळे सेक्शन्स वेगवेगळे. पैसे घेतात जास्त, पण मुलं खूप हुशार होतात’ आणि कौतुकानं समीरकडे बघत म्हणाली, “बघितलं ना कशी पटापट उत्तरे देतो ते. अगं ए टू झेड, नंबर्स, पोएम्स, कलर्स आणखी बरंच काही शिकवतात. गणित आणि सायन्स पण शिकवतात बरं. एकदम ट्रेन करून टाकतात. परत ऍन्युअल फंक्शनमधे मुलांना सर्व एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमधे पण मास्टर करून टाकतात.’ “पण प्ले स्कूलला कशाला इतकं शिक्षण?’ न राहवून मी विचारलं.
मी किती मूर्ख आहे अशा नजरेनं बघत मैत्रिणीनं माहिती पुरवली. “अगं ज्युनिअर के.जी. ला ऍडमिशन घ्यायची असेल, तरी आधी मुलांचा इंटरव्ह्यू होतो. त्यात ते पास झाले की मग पॅरेंट्सचा इंटरव्ह्यू आणि मग ऍडमिशन. खूप कठीण झालंय बाई सगळं!’
मी दचकलेच! हे काय चाललंय? जन्माला येऊन दोन वर्षांचा होत नाही तेवढ्यात इतकं शिक्षण? काय वाटत असेल या छोट्याशा जीवाला? जगातलं सर्व ज्ञान लवकरात लवकर ग्रहण करायचं आणि एका मोठ्या शर्यतीत भाग घ्यायचा, ती जिंकायची. अठरा ते वीस तास काम करायचं, कॉम्प्युटरपुढे बसून राहायचं, खोऱ्यानं पैसे मिळवायचे आणि आयुष्य संपवायचं. बसं हेच आयुष्य जगायचं. ह्याच शर्यतीसाठी ही पिढी प्लेस्कूलपासून तयार केली जातेय. हेच कशाला हल्ली तर काय गर्भसंस्कारही करतात म्हणे. म्हणजे जन्माच्या आधीच रोल मॉडेल तयार!
आणि मला माझी पहिली शाळा आठवली. माझं बालक मंदिर म्हणजे आताची प्ले स्कूल किंवा जुनियर के.जी. म्हणा किंवा सीनिअर के.जी. म्हणा. आमच्या वेळी सबकुछ एकच. आमच्या नंतर बालवाडी ही बालक मंदिराची थोडीशी सुधारित आवृत्ती आली. मी अडीच वर्षांची असतानाच बालक मंदिरात गेले होते. आमचं बालक मंदिर एका घराच्या मोटार गॅरेजमधे होते. काही नावही नव्हतं त्या शाळेला. त्यावेळी बालक मंदिराला नावं देण्याची प्रथा नसावी.
जुनाट, रंग उडालेल्या त्या मोटार गॅरेजमधे आम्हा 20 ते 25 बालकांची ती शाळा भरायची. एक करंदीकर नावाचं जोडपं ती शाळा चालवीत असत. आम्ही त्यांना बाबा व बाई म्हणायचो. बाबा निवृत्त बॅंक कर्मचारी होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. आम्हाला घरी आई-बाबा आणि शाळेत करंदीकर बाई-बाबा, दोघं सारखेच वाटायचे. तेच प्रेम, तोच जिव्हाळा, तेच स्वछंद जगणं. ना शिक्षणाचं टेन्शन, ना परीक्षेची चिंता. शाळा सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत. सकाळी उशिरापर्यंत झोप, आरामात अंघोळ आणि खाणं करून मग शाळेत जायचं. अगदी फिरायला बागेत जावं तशा आनंदात आणि उत्साहात आम्ही शाळेसाठी तयार व्हायचो.
आम्हाला शाळेत न्यायला-आणायला जगन यायचा. एका हातगाडीला आजूबाजूने लोखंडी कठडा आणि वर पत्र्याचे छप्पर. गाडीत सतरंजी अंथरलेली. अशी होममेड ढकलगाडी बनवली होती. तो रोज आम्हाला शाळेत नेत असे आणि परत आणत असे. आमची आई दरवाजात आम्हाला सोडी आणि जगन कड्यावर उचलून आम्हाला गाडीत बसवत असे. या गाडीतून मजा करत शाळेत जायचं. कधी कोणी मूल रडत असलं की जगन त्याला कडेवर घेत असे आणि एका हाताने गाडी ढकलत असे. अजूनही ती सफर आठवते. ती गाडी अलाऊद्दीनच्या उडत्या सतरंजीसारखी एखादी अनोखी वस्तू म्हणून स्वप्नात येते. कायम आठवते.
करंदीकर बाबा आणि बाईंनी नर्सरी कोर्स केला होता की नाही, माहीत नाही, पण त्यांना मुलांचा सर्वांगीण विकास करण्याची कला अवगत होती. गायन, गोष्टी, नृत्य, खेळ, भाषा, शब्द संग्रह, हे सगळं त्यांनी एकदम हसत खेळत कधी शिकवलं ते कळलं पण नाही आणि अशा पद्धतीनं शिकवलं की आज साठाव्या वर्षी देखील एखाद्या सुखद आठवणींप्रमाणे आठवतं. त्यांची गोष्टी सांगण्याची कला तर फारच अफलातून होती.
भोपळ्यातील म्हातारीची गोष्ट त्या 2 वर्षांच्या काळात किती तरी वेळा ऐकली असेल, पण आजकालच्या इंटेलिजंट मुलांसारखे, “भोपळ्यात म्हातारी कशी मावली?’ वगैरे प्रश्न काही आम्हाला कधी पडलेच नाही. कारण गोष्ट सांगताना बाबा कधी भोपळा, तर कधी वाघ, तर कधी म्हातारी बनत आणि त्यांच्या गोष्टीतील भोपळा, त्यातली म्हातारी, जंगलाची भयानकता, वाघ सगळं कसं सजीव होऊन जात असे. “चांदोबा… चांदोबा भागलास का’ ही कविता त्यांच्या तोंडून ऐकताना चांदोबा खरोखरचा मामाच वाटायचा. त्या परीच्या गोष्टी अगदी परिस्तानातच घेऊन जायच्या. बाई अगदी परीसारखे पंख हलवायच्या आणि बाबा राक्षसाचे रूप घेऊन परीला पकडायला येत. खूप जिवंत वाटायच्या त्या गोष्टी.
बाई-बाबा आम्हाला महाभारत, रामायणातल्या गोष्टी पण सांगायचे, पण अगदी सोप्या भाषेत आणि छोट्या छोट्या स्वरूपात, एकेका प्रसंगाचे वर्णन करायच्या. जसे द्रौपदीचे वस्त्रहरण, लाक्षागृहाचा प्रसंग, सीतेचे स्वयंवर, लक्ष्मणरेषा, हनुमानाचे लंकेतील प्रताप, खारीची सेतू बांधतांनाची मदत. या सगळ्या गोष्टी तुकड्या तुकड्यात ऐकायचो तेव्हा त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीच वाटायच्या. मोठे झाल्यावर कळले की त्या रामायण महाभारतातील गोष्टी होत्या.
थोडे मोठे झाल्यावर त्या लक्ष्मणरेषेसारखी रेषा आम्ही पण काढायचो. संध्याकाळी मंदिरात जाताना वाटेत एखादा बैरागी दिसला की त्याच्या पुढे लक्ष्मणरेषा काढायचो आणि त्याला चार पावलं मागे ढकलण्याची मजा घ्यायचो. त्यांनी शाळेत काही खेळाची साधनंही आणून ठेवली होती. अगदी साधीसुधी, पण ती दोघं अगदी लहान मुलांसारखी आमच्या बरोबर खेळायची. त्या खेळामधे स्पर्धा नसायची. त्यामुळे ते खेळ खूप आनंद द्यायचे. डबे आम्हाला घरून तर द्यायचेच पण रोज बाई-बाबासुद्धा आम्हाला काही तरी खाऊ द्यायचे. डबा खाण्याची वेळ काही नाही. भूक लागली की खा. मधली सुट्टी पहिलीत गेल्यावरच माहीत झाली.
बालक मंदिर हे अगदी सार्थ नाव होतं. त्या मंदिरात आम्हाला किती ज्ञान मिळालं, माहीत नाही. पण खूप मन:शांती, असीम आनंद मात्र मिळाला. आज साठ वर्षे झालीत. अजूनही ती शाळा, ते करंदीकर बाबा-बाई, ते खेळ, त्या गोष्टी… सगळं सगळं कसं अगदी लख्ख आठवतं. खऱ्या अर्थाने शाळेची, शिक्षणाची गोडी लावणारं ते माझं बालक मंदिर मनात घर करून बसलंय.
जुलेखा शुक्ल