आंबेगाव बुद्रुक – देशातील तेल कंपन्या सातत्याने डिझेल दरांमध्ये वाढ करीत असल्यामुळे मालवाहतूकदार त्रस्त झाले आहेत. 1 ते 5 मालवाहतूक वाहन असलेल्या व्यवसायिकांना खर्च भागवून नफा काहीच शिल्लक राहत नसल्याने ट्रक, टेम्पो अशी वाहने विक्रीस काढण्याशिवाय पर्याय नसल्याचे तसेच इंधन दरवाढीमुळे डिझेल, पेट्रोलची वाहने कोणी घेत नसल्याने अशा वाहनांना किंमतहह नसल्याने मालवाहतूक व्यवसाय बंदचा विचार अनेक जण करीत असल्याचे सांगण्यात आले.
मालवाहतूकदारांपुढे इंधन दरवाढीसह गेल्या दोन वर्षात वाढलेले विम्याचे दर, स्पेअर पार्ट टायर, नवीन दंड प्रणाली, टोलचे वाढते दर अशाही समस्या असून त्या प्रमाणात भाडेवाढ झाली नसल्याने मालवाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. छोट्या व्यावसायिकांना ता काहीच रक्कम शिल्लक राहत नसल्याने वाहनाचा बॅंक हप्ता भरायला की घर चालवायचे, अशा अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकार जोपर्यंत मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 67 (1 ) प्रमाणे वाहनाच्या क्षमतेप्रमाणे मालवाहतुकीच्या वाहनांचे पर टन कॅपॅसिटी प्रमाणे न्यूनतम दर ठरवित नाही तो पर्यंत वाहतूक व्यवसाय अडचणीत राहणार आहे.
वाहतूक व्यवसायिक मित्रांनो, जागे व्हा, एकत्रित येऊन सर्व सामान्य नागरिकांची अडवणूक न करता जनआंदोलन लढा दिला तरच इंधनाचे दर तसेच अन्य शासकीय कर कमी होतील. इंधनाचे दर वाढत गेल्यास हा व्यवसाय करणे कठीण होत जाणार आहे.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघ