भोर -करोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून या जागतिक संकटावर मात करण्यासाठी देशांतर्गत लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे निराधार दिव्यांग, निराधार वृद्ध नागरिक, गरोदर महिला, दुर्धर आजाराने बाधित असलेल्या निराधार व्यक्ती यांचे भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे जिल्हा परिषदेमार्फत अशा व्यक्तींकरिता शरद भोजन योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेचा लाभ दिव्यांनाही मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली. या व्यक्तींकरिता त्यांच्या मागणीनुसार त्यात गावातील अंगणवाडी मदतनीस यांचेमार्फत सकाळ, संध्याकाळ दोन वेळचे जेवण लॉकडाऊन कालावधीपर्यंत पुरविण्यात येणार आहे.
अंगणवाडी मदतनीसला या मोबदल्यात राज्य शासनाच्या शिवभोजन थाळीच्या धर्तीवर 50 रुपये प्रति थाळी प्रतिव्यक्ती असा मोबदला देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस असे अन्न पुरविण्यास सक्षम नसल्या तर ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे व तशा लाभार्थ्यास अंगणवाडी मदतनीस एकटी भोजन पुरवू शकणार नाही, अशा ठिकाणी बचत गटामार्फत भोजन पुरविण्यात येणार आहे. ज्या गावात बचत गट नाही असे प्रमाणपत्र संबंधित ग्रामसेवकांनी सादर केल्यास, गटविकास अधिकाऱ्यांच्या मान्यतेने इतर सक्षम व्यक्ती असे भोजन उपलब्ध करून देऊ शकतील, असे सांगण्यात आले आहे.