सातारा – शहर व जिल्ह्यात आठ दिवसांत 763 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाने सात ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून 321 बाटल्या रक्त जमा केले. करोना आणि इतर रोगांच्या उपचारात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात रक्तदान शिबिरे बंद करण्यात आली होती. त्याचा मोठा परिणाम रक्त संकलनावर झाला. राष्ट्रीय पातळीवर ही समस्या उद्भवली असून त्यावर मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दरम्यानच्या कालावधीत सातारा जिल्हा रुग्णालयाने सात ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचा वापर करत रक्तदान शिबिरात 321 बाटल्या रक्त गोळा केले.
मुळात एरव्ही जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रिया व उपचार लक्षात घेता चारशे बाटल्या रक्ताची गरज पडते. गरजेप्रमाणे खासगी हॉस्पिटललासुध्दा 40 ते 50 बाटल्या रक्त द्यावे लागते. मात्र, साताऱ्यात करोनामुळे काही खासगी ओपीडी बंद आहेत. तर शासकीय रुग्णालयात करोनाशिवाय दुसरा रुग्ण नाही. त्यामुळे रुग्णालयात केवळ चार ते पाच पिशव्यांची मागणी अपवादात्मक परिस्थितीत होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय रक्त पेढीच्या स्वाती पवार यांनी दिली. सातारा जिल्ह्यात थॅलेसेमियाचे 25 रुग्ण आहेत. प्रत्येक रुग्णांचा रक्त बदली करण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. त्यामुळे रक्त संकलनाचा हा साठा सध्या पुरेसा असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात शासकीुय रुग्णालयाच्या रक्तपेढीसह नऊ खासगी रक्तपेढ्या कार्यरत आहेत. राज्य रक्त संक्रमण परिषदेने करोनाच्या फैलाव सुरू होण्याआधीच या पेढ्यांना उन्हाळा तीव्र होण्याआधी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, कोरोनाची चर्चा सुरू झाली आणि शिबिरे थांबवावी लागली. दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज 15 ते 20 बॅग तर उपजिल्हा रुग्णालयात 10 ते 15 बॅग रक्ताची आवश्यकता असते. या प्रमाणात रक्त वापरात आल्यास पुढील दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच साठा शासकीय पेढीकडे होता. मात्र, तो अनुशेष भरून काढण्यात आला आहे. तुलनेत खासगी रक्तपेढ्यांकडे पुढील दोन महिने पुरेल एवढा रक्तसाठा आहे.
मात्र, पांढऱ्या पेशींचे विलगीकरण करून त्याचा पुरवठा करण्याची यंत्रणा कोलमडली आहे. कारण, पेशी विलग केल्यानंतर त्या पाच दिवसांत वापराव्या लागतात. गेल्या काही दिवसांत शिबिरेच न झाल्याने ही यंत्रणा ठप्प होती. साताऱ्याच्या पूर्व ग्रामीण भागात सुट्टीचा कालावधी साधून आयोजित रक्तदान शिबिरात पावणेचारशे बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. भविष्यातील रक्ताची मागणी लक्षात घेता रक्त संकलनाचा अनुशेष भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. अन्यथा मोठे संकट उभे राहू शकते, असे रक्त संक्रमण केंद्राचे अधिकारी डॉ. पद्माकर कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या संकटातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहेत. त्यातून काही मुद्दे चर्चेत आले आहेत. त्यानुसार रक्तदानासाठी पुढे येणाऱ्या संस्था, संघटना, मंडळे यांनी शिबिर आयोजित न करता टप्प्याटप्प्याने कार्यकर्त्यांना रक्तपेढीत पाठवावे, असा मार्ग काढण्यात आला होता.