मी माझे, मला हे शब्द तसे पाहता मानवी स्वभावातील अतिशय प्रिय शब्द. माणसातील “मी’पणा सहसा कधीच जात नाही. हा मीपणा म्हणजेच मानवाचा अहंभाव असतो. इतरांपेक्षा मी कसा वेगळ्या धाटणीचा किंबहुना श्रेष्ठ आहे ही भावना त्यात अंतर्भूत असते. मीपणाच्या जाळ्यात अडकलेला माणूस स्वतःभोवती एक सीमा आखून घेत असतो. ज्याप्रमाणे भिंतीवरील कोळी हा आपल्या शरीरातील एका विशिष्ट रसायनाने एक भलेमोठे जाळे स्वतःभोवती तयार करीत असतो. अगदी त्याचप्रमाणे माणूसही मीपणाचे, अहंकाराचे जाळे स्वतःभोवती विणून त्यातच गुंतून पडत असतो. साहजिकच अशा माणसाच्या प्रगतीला मर्यादा येत असतात. अहंकार, मीपणा तसा वाईटच. अहंकाराची भावना जेव्हा मनुष्याच्या स्वभावात उतरते तेव्हा ती त्या व्यक्तीच्या सद्विचारांना पोखरत असते. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी अहंकाराबाबत म्हटले आहे की, अधिक ज्ञान अहंभाव कमी करतो तर अधिक अहंकार ज्ञान कमी करतो.
मीपणाचा अतिरेक झाला की “मी’ म्हणजे सर्व आणि मी म्हणेल तसं झालंच पाहिजे असं सुरू होतं. दुर्दैवाने अशी अहंकारी व्यक्ती स्वत:ला फार प्रामाणिक आणि निर्मळ समजत असते; परंतु कधी ना कधी अहंकाराचा बुडबुडा फुटतोच हे लक्षात घ्यायला हवे.
“अहंकार’ हा मानवाच्या प्रगतीपथाच्या आड येणारा सर्वांत मोठा दुर्गुण. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अहंकार असतोच. कुणाला संपत्तीचा, कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. अहंकाराच्या अतिरेकामुळे माणसाला त्याचा अहंकारच मारक ठरतो.
अहंकार मे तीन गये
धन, वैभव और वंश
ना मानो तो सोचलो
रावण, दुर्योधन और कंस
या तिघांकडेही पूर्ण भूलोकावर वर्चस्व गाजवणाऱ्या सर्व गोष्टी होत्या, असाध्य साध्य करण्याची क्षमता होती; परंतु यांचा विनाश केला तो त्यांच्यातील अहंकाराने. यातूनच आपण सर्वांनी असा बोध घेतला पाहिजे.
एक प्रसिद्ध मूर्तीकार होता. जो एका मूर्ती बनविण्याच्या कारखान्यात कामास होता. वीस-बावीस वर्षे त्याने अतिशय उत्तमरित्या त्या कारखान्यात काम केले होते. दोन वर्षांनी तो त्या कारखान्यातून निवृत्त होणार होता. त्याला एक मुलगा होता. त्याने त्याच्या मुलालाही सुबक मूर्ती बनविण्यात निपुण केले होते. आपल्या रिटायरमेंटनंतर आपल्या मुलाला आपल्या जागी नोकरी मिळावी ही त्याची इच्छा होती. त्याचा मुलगा त्याला नेहमी वेगवेगळ्या मूर्ती बनवून दाखवीत असे; परंतु दरवेळी काहीतरी कमतरता दाखवून तो मूर्तीकार अजून चांगली बनविण्याचा सल्ला देत असे.
असे बरेच दिवस चालले. एके दिवशी मुलाने एक शक्कल लढविली. त्याने एक आकर्षक मूर्ती तयार केली आणि आपल्या मित्राच्या हातून वडिलांजवळ पोहोचवली. तसेच ही मूर्ती मित्राने तयार केल्याचे सांगितले आणि काय आश्चर्य त्या मूर्तीकाराने मुलाच्या मित्राची मूर्ती समजून त्याच्या मित्राचे खूप कौतुक केले. आता मात्र मूर्तीकाराच्या मुलाने मूर्तीकाराला प्रश्न विचारला, “बाबा ही मूर्ती खरंच सुंदर आहे का?’
मूर्तीकार बोलला, “हो शंकाच नाही.’
आता मुलाने त्या मूर्तीकाराला खरे काय ते सांगितले. तसेच “तुम्ही मी बनविलेल्या मूर्तीची कधीही प्रशंसा करीत नाही आणि आज मात्र माझ्या मित्राने बनविलेल्या मूर्तीची प्रशंसा केली. जी मूर्तीही मी स्वतः केली होती. मग असे का?’ त्यावर मूर्तीकार बोलला, “बाळा मी दरवेळी तुझ्या मूर्तीत दोष काढत राहिलो त्यामुळे तू अधिक सुंदर मूर्ती घडवू शकलास. मी जर सुरुवातीलाच तुझ्या मूर्तीची स्तुती केली असती तर कदाचित तुझ्यात अहंभाव निर्माण झाला असता. मीपणाच्या भावनेने तू तुझ्या कलेकडे दुर्लक्ष केले असते. म्हणूनच मी नोकरीतून रिटायरमेंट घेत आहे; परंतु माझ्याजागी तू नोकरीस लागावे म्हणून तुझ्यातील मीपणाची रिटायरमेंट मी केली.’ मुलाने भावनिक होऊन वडिलांना घट्ट मिठी मारली आणि मीपणाचा त्याग करण्याचा निश्चय केला. प्रत्येकाच्या आयुष्यात अहंभाव, मीपणा हा त्याचे काम चोख बजावत असतो. मात्र, यातून आपली मोठी हानी होत असते.
मुके होता काय पदरिचे जाते
मूर्ख ते भोगिते मी मीपण आई
आपुलिये घरी मैंद होउनि बैसे
कवणासी ऐसे बोलो नको आई
उपरोक्त अभंगात तुकोबारायांनी याच मीपणाच्या व्याधीवर नेमके बोट ठेवले आहे. स्वतःचा बडेजाव करणाऱ्यांनी एकवेळ मुके व्हावे, घरी शांत बसावे परंतु मीपण मिरवू नये. आयुष्य आनंदाने आणि समाधानाने जगण्यासाठी मीपणाची, अहंकाराची रिटायरमेंट वेळीच केली पाहिजे.
व्यक्तिमत्त्व
सागर ननावरे