पाथर्डी – पाथर्डी, आष्टी व नगर तालुक्यांत सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पाथर्डीत तीन बालके व आष्टी तालुक्यातील दोन व्यक्तींचा बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्यामुळे वनविभागातर्फे या परिसरात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पथके तैनात केली आहेत. आज सकाळी मढी येथील चैतन्यनगर परिसरात वनविभागाने चौथ्या बिबट्यास जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
वनविभागाने गर्भगिरी डोंगर परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावले आहेत. या पिंजऱ्यात खाद्य म्हणून पशू ठवले आहेत. तसेच तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची पथकेही या परिसरात तळ ठोकून आहेत. आज सकाळी मढी येथील पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. बुधवारी एका बिबट्याने याच परिसरात एका कुत्र्याचा फडशा पाडला होता. या कुत्र्याचा अर्धवट खाल्लेला भाग वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पिंजऱ्यात ठेवला होता. रात्रीच्या वेळी हे अर्धवट कुत्रे खाण्याच्या नादात बिबट्या अलगद पिंजऱ्यात कैद झाला. तालुक्यात हा चौथा बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.
यापूर्वी तीन बिबटे वनविभागाने पकडले आहेत. आज पकडलेला बिबट्या नर जातीचा आहे. मात्र हा नरभक्षक बिबट्या आहे का, हे मात्र समजू शकले नाही. बिबट्याला नगर येथे हलविण्यात आले आहे. तेथून त्याला जुन्नर येथील बंदीस्त केंद्रामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती तिसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी दिली.