– हिमांशू
धूम्रपान करणे आरोग्यास अपायकारक आहे, हा वैधानिक इशारा सिगारेटच्या पाकिटावर वर्षानुवर्षे छापला जातोय. आपल्याकडे तर चित्रमय इशारा छापला जातो. सिगारेटच्या पाकिटाचा जवळजवळ 85 टक्के भाग इशार्याचाच असतो. परंतु जानेवारी 2024 च्याच आकडेवारीनुसार आपल्या देशात सुमारे साडेसात कोटी लोक धूम्रपान करतात. यात सुमारे 58 लाख महिलांचाही समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 25 कोटींपेक्षा जास्त लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आहे. प्रश्न असा, की भयावह चित्रांनी पाकिटाचा बहुतांश भाग व्यापलेला असताना धूम्रपान करणार्यांना तो दिसत कसा नाही? त्याला कारण आहे तलङ्ग आणि एकदा ती जागी झाली, की समोर सिगारेटव्यतिरिक्त बहुधा काहीच दिसत नसावं. म्हणजेच, समस्या सौम्य करायची असेल तर ही तलङ्ग आटोक्यात आणावी लागेल. तसे प्रयत्न होतच नाहीत का? तेही मोठ्या प्रमाणावर होतात.
पाकिटावरचे वैधानिक इशारे हा त्याचाच एक भाग आहे. मृत्यूला कोण घाबरत नाही? ती भीती दाखवली, की तलङ्ग नियंत्रित करण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा असते. परंतु जिथं तीही पूर्ण होताना दिसत नाही, तिथं काहीतरी वेगळा मार्ग अवलंबण्याची गरज जाणवते. त्या दृष्टीनं नुकताच आलेला एक अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. जी गोष्ट भीती दाखवून होत नाही, ती प्रोत्साहन देऊन करता येईल का, याचा विचार व्हायला हवा.
मरणाची भीती जिथं काम करत नाही, तिथं जगण्याची आशा काम करू शकेल, असा विचार का करू नये? परंतु त्यासाठी ‘एनईजेएम एव्हिडन्स’या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाची सकारात्मकतेनं दखल घ्यावी लागेल आणि त्यातील निष्कर्षांना ठळक प्रसिद्धी द्यावी लागेल. सिगारेटमुळे तब्येतीचं होणारं नुकसान सामान्यतः कायमस्वरूपी मानलं जातं. परंतु हा अहवाल असे सांगतो, की चाळिशीच्या आत सिगारेट सोडलीत, तर दहा वर्षांनी तुमचं शरीर पुन्हा एकदा इतकं सक्षम होईल, की तुम्ही अजिबात धूम्रपान न करणार्यांइतकं आयुष्य जगू शकाल.
तरुणपणी लागलेलं धूम्रपानाचं व्यसन सोडणं नंतर अनेकांना शक्यच होत नाही. उलट कौटुंबिक जबाबदार्या आणि तणावांचं निमित्त पुढे करून व्यसनाच्या वाढत्या प्रमाणाचं समर्थनच केलं जातं. त्याउलट जर चाळिशीच्या आत धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रामाणिकपणे अंमलात आणला, तर त्याचे सुपरिणाम पुढील तीनच वर्षांत दिसू लागतात. दहा वर्षांनी व्यक्ती निर्व्यसनी व्यक्तीसारखीच ठणठणीत होते, असे टोरंटो विद्यापीठाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील संशोधकांनी या अहवालात नमूद केलंय.
याचाच अर्थ, चाळिशी जवळ आलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. संशोधकांनी दीड कोटी प्रौढ व्यक्तींचा अभ्यास 15 वर्षांपेक्षा अधिक काळ करून असं सांगितलंय की, 40 ते 79 वर्षे वयोगटातील धूम्रपान करणार्यांना मृत्यूचा धोका धूम्रपान न करणार्यांपेक्षा तिप्पट अधिक असतो. त्यांना सुमारे 12 ते 13 वर्षांच्या आयुष्यावर उदक सोडावे लागते. चाळिशीत धूम्रपान सोडणार्या व्यक्तींनी अकाली मृत्यूचा धोका जवळजवळ 30 टक्क्यांनी कमी केल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवलंय. म्हणूनच, सिगारेटचे व्यसन सोडायला आता उशीर झाला, असं कुणी समजता कामा नये.