वर्धा: हरतालिका विसर्जनासाठी गेलेल्या चौघ बुडाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथे घडली आहे. बुडालेल्यांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर इतर तीन व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
वणा नदीमध्ये हरतालका विसर्जनासाठई गेलेल्या दोन महिला आणि एक लहान मुलगा आणि मुलगी यांचा तोल जाऊन हे चौघेही नदीत बुडाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेनंतर नदीवर आलेल्या इतर महिलांनी जोरदार आरडा ओरड केल्यावर इतर नागरिक घटना स्थळावर जमा झाले. त्यानंतर पोलिसांना तात्काळ फोन करत घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर शोध घेण्यास सुरवात झाली. यावेळी एका महिलेचा मृतदेह नदीतून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु एक महिला आणि दोन लहानग्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यामुळे बेपत्ता तिघांचा शोध सुरूच आहे.