इटानगर -अरूणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या दुर्घटना घडल्या. त्यामध्ये एका महिलेसह चौघे मृत्युमुखी पडले. अरूणाचलमध्ये काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे काही ठिकाणी डोंगरांलगत असणाऱ्या घरांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये काही जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयांत दाखल करण्यात आले. भूस्खलनाच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले.
त्या कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथकेही सहभागी झाली. मात्र, खराब हवामान आणि विविध यंत्रसामुग्रीच्या अभावामुळे त्या कार्यात अडथळे येत असल्याचे समजते. पाऊस आणि भूस्खलनामुळे काही ठिकाणी संपर्क यंत्रणाही विस्कळीत झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.