आरोपी शाहबाज हुसेनची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता
जयपूर : जयपूरमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सैफुर रेहमान, सरवर आझमी, मोहम्मद सैफ आणि सलमान अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील पाचवा आरोपी शाहबाज हुसेनची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
जयपूर येथे 13 मे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये 79 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. तर 185 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांनी परकोटे भाग हादरला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते, तर चार आरोपींना दोनच दिवसांपूर्वी 18 डिसेंबर रोजी जयपूरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते.
या चारही आरोपींना आज शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या 11 वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता. जयपूर बॉम्बस्फोटातील तीन दहशतवाद्यांचा देशातील अन्य भागांत झालेल्या बॉम्बस्फोटांतही सहभाग असल्याचे आढळून आले होते. जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर प्रत्यक्षात न्यायालयात चार आरोपपत्र दाखल करण्यात आली होती.
जयपूर बॉम्बस्फोट खटल्यातून शाहबाज हुसेन या आरोपीला दोषमुक्त करण्यात आले आहे. शाहबाजविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेणारा जो ई-मेल पाठवण्यात आला होता तो शाहबाजने पाठवल्याचा आरोप होता. अन्य चार आरोपींना भादंवि कलम 120 ब अन्वये दोषी धरण्यात आले आहे. या प्रकरणी विशेष न्यायाधीश अजयकुमार शर्मा यांनी सहा महिन्यांपूर्वी निर्णय राखून ठेवला होता.