बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याविषयी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी मिश्कील प्रतिक्रिया दिली. सुदैवाने, मोदी अब की बार ६०० पार म्हटले नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
जागांचा आकडा पुढे करण्याचा अहंकारी प्रचार, विरोधकांना कमी लेखणे आणि सर्व काही मीच असल्याचा आविर्भाव दुर्दैवी आहे. सत्तेत येण्याचा विश्वास असणारा नेताही असे बोलणार नाही. सर्व सचिवांना बोलावून मोदी पुढील पाच वर्षांचे कार्यक्रम ठरवत आहेत. तशा प्रकारचा अतिआत्मविश्वास आणि अहंकार देशासाठी, लोकशाहीसाठी योग्य नव्हे, असे भाष्य खर्गे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी केले.
आतासारखी स्थिती २००४ यावर्षीही होती. त्यावेळी भाजपने इंडिया शायनिंगचे चित्र रंगवले. दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी हेच सर्वांत योग्य पंतप्रधान असल्याचे म्हटले. पण, त्यावेळी काय घडले? मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसप्रणित सरकार स्थापन झाले.
सिंग चांगले पंतप्रधान ठरले. त्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था जोमात आली. ते चांगले प्रशासक ठरले. भारतीय मतदार अतिशय सुज्ञ आहे. सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळाल्यास २००४ ची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्यानंतर चित्र सकारात्मक आणि चांगले बनले आहे. महागाई कमी होण्यासारखे लाभ मिळवून देणारे कार्यक्रम जनतेला हवे असल्याचे कॉंग्रेसच्या गॅरंटी योजनांनी दाखवून दिले. त्या योजनांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे, असा दावा खर्गे यांनी केला.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याविषयीच्या प्रश्नावर प्रथम आम्ही जिंकण्याची गरज असल्याचे उत्तर त्यांनी दिले. पंतप्रधान कोण याविषयीचा निर्णय निवडणुकीच्या निकालानंतरच होईल. आम्ही जिंकलो तर त्या निर्णयाविषयी आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.