पुणे -“राजकरणात गोळाबेरीज करावी लागते. संख्येला महत्त्व असते. त्यामुळे काही लोक आपल्याला सोडून गेले असले, तरी ते काही महिन्यांत आपल्यात परत येतील. त्यांना झिडकारू नका. अनेक जण आपली कामे करून पुन्हा परत येतील,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना बळ दिले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, शांतीलाल सुरतवाला, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, अश्विनी कदम, श्रीकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, “राजकारणात प्रत्येकाला येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सध्याचा प्रसंग इतर वेळीपेक्षा वेगळा आहे. आपले जरी लोक सोडून गेले असले, तरी जनमत शरद पवार यांच्यासोबत आहे. राजकारणात गुद्द्याची नाही, तर मुद्द्यांची लढाई असते. कितीही प्रलोभने येतील, दबाव येईल, हे दूर ठेवून पक्षासोबत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांची बैठकीला दांडी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. शुक्रवारी सकाळी ही बैठक संस्थेच्या मांजरी येथील कार्यालयात होणार होती. त्यासाठी अध्यक्ष शरद पवारही उपस्थितीत राहणार होते. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने सकाळपासूनच राजकीय चर्चा सुरू होत्या.
मात्र, सकाळी आठ वाजता मार्केटयार्डातील कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या अजित पवार यांनी नंतर मांजरीकडे न जाता थेट दौंड येथील कार्यक्रमाला जाणे पसंत केले. तर मांजरी येथे झालेल्या बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांनी बैठकीस दांडी मारल्याने दिवसभर याची चर्चा होती.