नगर -करोना महामारीच्या संकटात शेतकरी देखील आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे अशी मागणी निंबळक गटातील ग्रामस्थांनी कृषीमंत्री दादासाहेब भुसे व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निंबळकचे माजी संरपच विलास लामखडे, समीर पटेल, भाऊराव गायकवाड, पोपट गाडगे, अशोक कळसे, खारेकर्जुने येथील दत्तात्रय शेळके पाटील, विकास निमसे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. करोनाचा फटका मोठ-मोठ्या उद्योगधंद्यासह सर्वसामान्य व्यापारी, व्यावसायिक व कामगारांना बसला आहे. तर यापासून शेतकरी देखील वाचलेले नाही. करोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी करोनासह विविध नैसर्गिक संकटात सापडला आहे.
या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी निंबळक गटातील ग्रामस्थांनी केली आहे. कृषी विभागाच्या एका कार्यक्रमा निमित्त कृषीमंत्री भुसे व ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आले असता त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.