देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या महासमितीच्या रायपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये पक्षाच्या आगामी कालावधीसाठी रणनीती निश्चित करण्यात आली. सध्या सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला अन्य पर्याय उपलब्ध होतो आहे की नाही, अशी शंका निर्माण होत असतानाच कॉंग्रेसने ज्या प्रकारे या रणनीतीची घोषणा केली आहे ती पाहता आगामी कालावधीमध्ये निश्चितच भाजपला सक्षम पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू होतील, अशी आशा करायला वाव आहे.
देशात एक सक्षम राजकीय पर्याय उभा करू, अशा प्रकारची घोषणा या महाअधिवेशनामध्ये कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत देत असतानाच राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व जाणार असल्याचे सूचित केल्याने राहुल गांधी यांचे नेतृत्व हासुद्धा कॉंग्रेसच्या रणनीतीचा भाग असू शकेल. सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ यात्रेचा उल्लेख करून या यात्रेच्या निमित्ताने चांगली वातावरणनिर्मिती झाली असून कॉंग्रेस पक्षाने याच पायावर आधारित रणनीती निश्चित करून केंद्रातील मोदी सरकारला पर्याय उपलब्ध करावा, असे म्हटले आहे.
कोणत्याही पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये होणाऱ्या विविध नेत्यांची भाषणे आणि या अधिवेशनामध्ये होणारे ठराव ही एक नेहमीची वार्षिक गोष्ट असली तरी कॉंग्रेस पक्षाचे हे महाअधिवेशन निश्चितच महत्त्वाचे मानावे लागणार आहे. एकतर मोदी सरकारला पर्याय कसा उपलब्ध करावा याबाबत सर्वच राजकीय पक्षांचे विचारमंथन सुरू असताना कॉंग्रेसने असा पर्याय उभा करण्यासाठी पुढाकार घेणे निश्चितच महत्त्वाचे मानावे लागणार आहे. देशात एक सक्षम राजकीय पर्याय उपलब्ध करू, असे जेव्हा खर्गे म्हणतात तेव्हा कॉंग्रेस स्वबळावर अशा प्रकारचा पर्याय उपलब्ध करू शकत नाही तर आघाडीच्या माध्यमातूनच हा पर्याय उपलब्ध होऊ शकतो याची जाणीव त्यांनाही आहे. यापूर्वीही सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असल्याने पुन्हा एकदा तो प्रयोग करण्याचे संकेत कॉंग्रेसच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने मिळत आहेत.
बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही दोन दिवसांपूर्वी अशाच आशयाचे विधान केले होते आणि कॉंग्रेसच्या निर्णयाकडे अनेक पक्ष डोळे लावून आहेत, असे त्यांनी म्हटले होते. “भारत जोडो’ यात्रेमुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व उजळून पुढे आले असल्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली जर आघाडी करायची असेल तर कॉंग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने आगामी काळात वाटचाल करावी लागणार आहे. कोणताही एक राजकीय पक्ष स्वबळावर भाजपला टक्कर देऊ शकत नाही, हे वास्तव स्वीकारल्यानंतर जर भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी पुढाकार कॉंग्रेससारख्या मोठ्या राजकीय पक्षालाच घ्यावा लागेल ही बाबही या ठिकाणी विसरून चालणार नाही. साहजिकच आगामी कालावधीमध्ये कॉंग्रेस नेत्यांकडून विशेषत: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून त्या दिशेने पावले उचलली जातील, अशी आशा करावी लागेल. अशा प्रकारची मोट बांधणे अवघड असले तरी अशक्य नाही, ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जेव्हा अशा विरोधकांची आघाडी बांधण्याचा विषय समोर येतो तेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हा विषय नेहमी चर्चेला येतो. त्याच ठिकाणी या आघाडीचे गाडे अडते.
आज भाजपाला आपला प्रमुख विरोधक मानणारे जे इतर राजकीय पक्ष आहेत त्या बहुतेक पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असल्यानेच हा घोळ निर्माण होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही असेही राजकीय पक्ष आहेत ज्यांना कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांपासून समान अंतर ठेवायचे आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी हा कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही आपला विरोधक मानतो. अशा काही राजकीय पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी असो किंवा तेलंगणा, आंध्र प्रदेशमधील नेते असोत या नेत्यांनाही भाजपबरोबरच कॉंग्रेसही आपला विरोधक वाटतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये प्रादेशिक अस्मितांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बहुतेक सर्व प्रादेशिक पक्षांना आपल्या प्रदेशापुरतेच यशस्वी राजकारण करायचे आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये केवळ राजकीय अपरिहार्यतेमुळे शिवसेना हा पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीच्या निमित्ताने जरी एकत्र आला असला तरी या आघाडीमध्येही अंतर्विरोध आहेत. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीशी युती केली आहे; पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर कायम कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपला राजकीय शत्रू मानत आले आहेत. असे अनेक अंतर्विरोध भाजप विरोधकांमध्ये आढळतात. या सर्व गोष्टींचा विचार करूनच एका किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सर्वांना एकत्र आणले तरच देशात सक्षम राजकीय पर्याय निर्माण होण्याची आशा बाळगता येईल. ज्या प्रकारे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते ते पाहता राहुल गांधी यांनीच आता भाजपविरोधात एक मोट बांधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
पूर्वी भाजपामध्ये असलेले आणि सध्या कॉंग्रेसमध्ये असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी जे एक विधान केले आहे ते या निमित्ताने सर्वांनीच लक्षात ठेवायला हवे. सध्या पंतप्रधान कोण होणार हे ठरवण्याच्याऐवजी पंतप्रधान कोणाला होऊ द्यायचे नाही हे ठरवणे जास्त महत्त्वाचे आहे, हे शत्रुघ्न सिन्हा यांचे विधान महत्त्वाचे आहे. साहजिकच कॉंग्रेसला आपली रणनीती जर यशस्वी करायची असेल आणि सर्व राजकीय पक्षांची एकत्र मोट बांधायची असेल तर पंतप्रधानपदाचा विषय थोडा बाजूला ठेवून एक सक्षम राजकीय आघाडी उभारण्यासाठीच प्रयत्न करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीसारखा प्रयोग करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येते, हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे.