जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये सध्या पाचव्या स्थानावर असलेल्या आणि 2047 पर्यंत तिसरे स्थान मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्या भारताने आता प्रदूषणामध्ये मात्र जागतिक पातळीवर तिसरे स्थान मिळवले आहे. एकीकडे विकास होत असतानाच दुसरीकडे या विकासाला जी प्रदूषणाची काळी झालर लाभत आहे ती मात्र चिंताजनक मानावी लागणार आहे. स्वित्झर्लंडमधील ‘आयक्यूएआर’ या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणार्या संस्थेने 2023 च्या संदर्भातील आपला अहवाल सादर केला असून त्यामध्ये हवेच्या प्रदूषणामध्ये भारत जगात तिसरा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात प्रदूषित जी 50 शहरे आहेत त्यामध्ये भारतातील 42 शहरांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची राजधानी असलेली नवी दिल्लीसुद्धा सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.
जे विविध उपक्रम राबवले जात आहेत किंवा ज्या महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्या जात आहेत त्या आपापल्या ठिकाणी योग्य असल्या तरी सत्ताधार्यांनी आता या प्रदूषणाच्या विषयाकडेसुद्धा गांभीर्याने पहावे, असा संदेशच या अहवालाने दिला आहे. अर्थात, या अहवालातील जे निष्कर्ष आहेत ते हवेच्या प्रदूषणाच्या निमित्ताने आहेत आणि भारतातील ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषण हे तर अधिकच गंभीर विषय आहेत. पण हवेच्या प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असल्याने भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला आता या विषयाची गंभीर दखल घ्यावीच लागणार आहे. स्वित्झर्लंडमधील ज्या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे त्या संस्थेने जगातील 134 देशांची यादी तयार केली असून या सर्व देशातील हवेची गुणवत्ता तपासली आहे.
त्यामध्ये भारताचा तिसरा नंबर आहेच; पण भारताच्या वर असलेले जे दोन देश आहेत त्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे शेजारी देशच आहेत. विकासाच्या बाबतीमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान हे देश भारताच्या आसपासही नसले तरी प्रदूषणाच्या बाबतीत भारताने या दोन देशांशी जवळीक साधली आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. गेल्या कित्येक वर्षांपासून स्वित्झर्लंडमधील ही संस्था हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करीत आहे. 2018 पासून जगातील सर्वात प्रदूषित शहरांची जी यादी तयार केली जात आहे त्यामध्ये सतत चौथ्यांदा नवी दिल्लीचा समावेश झाला आहे. जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारे राजधानीचे शहर म्हणून नवी दिल्लीची ओळख आहे आणि हेच शहर आता जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबाबत कोणते नकारात्मक चित्र तयार झाले असेल याचाही विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे.
एखाद्या देशाचा किंवा अर्थव्यवस्थेचा विकास होत असताना काही नकारात्मक बाजूसुद्धा स्वीकाराव्या लागतात हे जरी खरे असले, तरी चिरंतन विकासाचे तत्त्व लक्षात घेता विकासामुळे निर्माण होणारे हे प्रदूषित जीवन कोणालाही परवडणारे नाही. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येमध्ये झालेली प्रचंड वाढ, त्याचप्रमाणे उद्योगांची वाढती संख्या त्यामुळे एकीकडे कागदावरील विकास जरी दिसत असला तरी या वाहनांमधून बाहेर पडणारा काळा धूर असेल किंवा मोठमोठ्या कंपन्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर असेल त्याच्यामुळे हवेची गुणवत्ता किती कमी होते, याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. स्वित्झर्लंडमधील या संस्थेने 2023 मधील हा अहवाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे; पण 2022 मध्ये भारताचा क्रमांक आठवा होता.
म्हणजे केवळ एका वर्षाच्या कालावधीमध्येच भारतातील प्रदूषणाची तीव्रता किती प्रचंड प्रमाणात वाढली हे यावरून सिद्ध होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा जो प्रसार सुरू आहे त्याला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज या निमित्ताने समोर आली आहे. भारतासारख्या अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये वाहनांची संख्या आणि कंपन्यांची संख्या वाढतच राहणार यात कोणतीही शंका नाही. पण रस्त्यावरून धावणारी ही वाहने असो किंवा औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादनाचे काम करणार्या कंपन्या असोत त्यांच्या माध्यमातून कमीत कमी प्रदूषण कसे होईल याचाच विचार आता प्राधान्याने करावा लागणार आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ओबामा जेव्हा भारतात आले होते तेव्हा राजधानी दिल्लीतील प्रदूषणामुळे त्यांच्या आयुष्यातील काही सेकंद कमी झाल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील संस्थेने काढला होता.
एखादी परकीय व्यक्ती काही काळासाठी जेव्हा भारतात येते तेव्हासुद्धा भारतीय प्रदूषणाचा त्यांच्यावर परिणाम होतो मग कायमस्वरूपी भारतात राहणार्या नागरिकांवर ह्या प्रदूषणाचा किती घातक परिणाम होत असेल याचा विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जलप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कारखान्यांमधील दूषित पाणी नदीमध्ये मिसळण्याचा प्रकार असो किंवा जलसाठे या कारखान्यांमुळे प्रदूषित होण्याच्या घटना असोत मानवी जीवनाला अत्यावश्यक असलेले पाणीसुद्धा प्रदूषित होऊ लागले आहे. भारतातील ध्वनी प्रदूषण हा विषय तर नेहमीच चिंतेचा विषय असतो. उत्सवप्रिय भारतामध्ये नेहमीच कोणता ना कोणता उत्सव आणि सोहळा सुरू असल्याने त्यानिमित्ताने जो गोंधळ सुरू असतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण किती वाढते याचा विचारही कोणी करत नाही किंवा रस्त्यावरून सुसाटपणे धावणार्या वाहनांच्या हॉर्नमुळेसुद्धा ध्वनीप्रदूषणाची तीव्रता किती वाढते याचेही मोजमाप आता या निमित्ताने होण्याची गरज आहे.
एखादी आंतरराष्ट्रीय संस्था जेव्हा प्रदूषणविषयक अशा प्रकारचे अहवाल जाहीर करते तेव्हा त्याची गंभीर दखल जगातील सर्वच देश घेत असतात आणि जेव्हा भारतासारखा कायम चर्चेत असलेला विकसनशील देशही प्रदूषित देशांच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये असतो तेव्हा त्याचा नकारात्मक परिणामही होऊ शकतो, अशा निष्कर्षांचा थेट परिणाम पर्यटन विकासावर होतो. या व्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम किंवा उपक्रम भारतात घेतानाही इतर देश विचार करतात. एकीकडे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास साधत असतानाच दुसरीकडे हवेच्या प्रदूषणाची पातळी कमीत कमी कशी राहील याची दक्षता आगामी कालावधीमध्ये सरकारला घ्यावीच लागणार आहे. विकासाला प्रदूषणाची काजळी फारशी शोभनीय नाही. ही काजळी दूर करून किंवा ती किमान कमी करूनच विकासाचे ध्येय साध्य करण्याचे नियोजन आगामी कालावधीमध्ये सरकारला करावे लागणार आहे.