अखेर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि काल त्यांना अटक करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विरोधी विधान केल्यानंतर चोहोबाजूने जे काहूर माजले होते त्यावर उतारा म्हणून राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात बरेच तथ्य आहे. कोश्यारी यांच्या विधानावरून उठलेल्या वादळाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाल्यानंतर हे वातावरण फिरवण्याची क्षमता फक्त राऊत यांच्या अटकेच्या प्रकरणातच आहे, हे गणित लक्षात ठेवून दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर ही अटकेची कारवाई होणे हा योगायोग असू शकत नाही, या आरोपातही तथ्य आहे.
संजय राऊत हे शिवसेनेचे लढाऊ प्रवक्ता म्हणून गणले जातात. शिवसेना फुटल्यानंतरही त्यांनी अक्षरश: एकतर्फी खिंड लढवली. शिवसेनेचे आव्हान केवळ त्यांनी त्यांच्या धारदार वक्तव्यांनी तगून ठेवले होते. पक्ष फुटण्याच्या घटनेने एक दिवसही त्यांना नैराश्याने घेरलेले दिसले नाही, उलट आपला पक्ष आणि आपला आक्रमकपणा त्यांनी अत्यंत कौशल्याने जागृत ठेवला होता. त्यामुळे एक ना एक दिवस त्यांना अशा स्वरूपाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार, असेच एकूण वातावरण होते आणि तसेच झाले आहे. मुंबईतील पत्राचाळीच्या प्रकरणात राऊत यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणाचा सगळा तपशील तपासल्यानंतर यात जर काही गेैरव्यवहार झालाच असेल, तर त्यात वाधवान बंधू आणि त्यांचे सहकारी तसेच प्रवीण राऊत यांचा सहभाग असल्याचे लक्षात येते.
पत्राचाळीच्या पुनर्वसन प्रकल्पात तेथील स्थानिक रहिवाशांना त्यांचे हक्क नाकारले गेले, तेथील एफएसआयचा गैरव्यवहार झाला असे या प्रकरणाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. यात संजय राऊत यांच्या पत्नीला 55 लाख रुपये मिळाले होते, असे सांगितले गेले आहे. हे पैसे याच पत्राचाळ गैरव्यवहारातील आहेत असे ईडीचे म्हणणे आहे, पण हे पैसे उसने घेतलेले होते आणि राऊत यांच्या पत्नीने संबंधिताला ते परतही केले आहेत. त्यामुळे आजमितीला राऊत यांच्यावर कोणताही थेट आरोप नाही, असे हे प्रकरण पाहिल्यानंतर लक्षात येते. अर्थात, याला अन्यही काही कंगोरे असतीलही; पण ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाई मागे केवळ राजकीय दहशत माजवणे याचाच भाग अधिक आहे, हा दावा खरा वाटू लागतो.
आज ईडी म्हणजे भाजपचीच एक राजकीय शाखा बनली आहे आणि केवळ विरोधकांचे कंबरडे मोडण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जात आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. ईडीकडून भाजपच्या लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही. आजवर ईडीकडून जी छापेमारी केली गेली आहे त्यातील बहुतांश कारवाया या भाजप विरोधकांवरच झाल्या आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे विरोधकांचे आरोप अगदीच बिनबुडाचे नाहीत, असे लक्षात येते. आता तर कोणताही गुन्हा दाखल नसतानाही ईडीला कोणालाही अटक करण्याचा किंवा छापेमारी करून जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेच दिला असल्याने ईडी सुसाट सुटली आहे. ईडीने त्यांच्या अधिकारात कारवाया करून आर्थिक घोटाळे उघड करण्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, पण केवळ आपल्या राजकीय सूत्रधारांच्या सूचनेबरहुकूम त्यांनी कारवाया करण्यास मात्र आक्षेप आहे. त्यामुळे आपल्या कारवाया राजकीय सुडापोटी नसतात, तर खऱ्या अर्थाने आर्थिक घोटाळे उघड करण्यासाठीच असतात हे ईडीने दाखवून देण्याची गरज आहे.
अर्थात, ते या फंदात पडण्याची शक्यता नाही. कारण त्यांचे बोलविते धनी केंद्रात सत्तेत बसलेले आहेत. यातूनच मग राहुल गांधींना सतत पाच-सहा वेळा चौकशीला बोलावून तासन्तास त्यांची चौकशी करणे, त्यांच्या आजारी असलेल्या वृद्ध मातोश्रींनाही ईडी कार्यालयाच्या चकरा मारायला लावणे, असे प्रकार घडतात. आज सत्ताधाऱ्यांकडून हे जे पिसाटल्यासारखे राजकारण सुरू आहे त्यातून त्यांच्याविषयीच जनमत कलुषित होत आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. देशातील विरोधक पूर्ण संपवणे आणि त्यांच्यावर दहशत माजवून त्यांना गलितगात्र करणे हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा एकमेव फंडा असला तरी त्यातून देशाच्या राजकारणात निर्माण होणारी द्वेषाची भावना कायमस्वरूपी घर करून राहणारी असून त्यामुळे भविष्यात केवळ सूडचक्राचीच मालिका निर्माण होणार आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल. उद्या सत्तेचे पारडे फिरले तर नव्याने सत्तेवर येणारे लोक नुसतेच गप्प बसून राहतील अशी अपेक्षा करता येणार नाही, तेही याचे उट्टे काढणारच. त्यामुळे भविष्यात ही जी राजकीय सूडचक्र मालिका सुरू होईल ती देशाला कोठे घेऊन जाणार आहे याचा अंदाज बांधता येत नाही.
राजकीय षड्यंत्र रचून महाराष्ट्रातील सरकार खाली खेचले गेले, शिवसेनेत फूट पाडली गेली आणि एवढे करूनही भाजपचे समाधान झालेले नाही. त्यांनी संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करून शिवसेनेचा आवाजच दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळातील हा सारा घटनाक्रम पाहून सामान्य माणूस पुरता चक्रावला आहे. राजकारणाचे हे स्वरूप त्याच्या पचनी पडणारे नाही. विरोधकांवर कुरघोड्या हा राजकारणाचा भागच असतो, पण त्यालाही काही तरी मानमर्यादा असायला हवी. हातातील सत्तेचा असा एकतर्फी दुरूपयोग कोणालाच मान्य होणारा नाही. भारतीय जनता पक्षाने आपल्याला जी लोकमान्यता मिळाली आहे ती शालिनतेने स्वीकारली पाहिजे. एक समंजस आणि जबाबदार पक्ष म्हणून त्यांनी आपले वर्तन ठेवले पाहिजे. किंबहुना विरोधकांना संपवण्यासाठी जे कौशल्य आणि तत्परता ते दाखवतात तितकेच कौशल्य दाखवून त्यांनी जनतेचे काही भले करता आले तर ते करावे अशी अपेक्षा आहे. असल्या विध्वंसक राजकीय खेळ्यातून ते स्वतःचेच भवितव्य धोक्यात आणत आहेत ही बाबही त्यांना ध्यानात घ्यावी लागेल.