लवकरच होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या आघाड्यांबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा सुरू केली असली आणि काही आघाड्यांची ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली, तरी अंतिम निर्णय झाल्यानंतरही कोणत्या ना कोणत्या पातळीवर असंतोष निर्माण होणे अपरिहार्य मानावे लागणार आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जो गोंधळात गोंधळ तयार झाला आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असंतोष निर्माण होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने गेल्या आठवड्यात आपल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली; पण त्यामध्ये महाराष्ट्राच्या उमेदवारांचा समावेश नव्हता. कारण महाराष्ट्रामध्ये भाजपचे मित्र पक्ष असलेले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन पक्षांना जागा वाटपामध्ये किती जागा द्यायच्या, याचा अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने महाराष्ट्राबाबतचा निर्णय प्रलंबित राहिला.
अजित पवार यांचा गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघाही गटांच्या नेत्यांनी आपापल्या इच्छा यापूर्वीच व्यक्त केल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राच्या जागा वाटपाचा विचार करता भारतीय जनता पक्षाने 25 आणि शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. तर काँग्रेस आघाडीमध्ये काँग्रेसने 26 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 22 जागा लढवल्या होत्या. यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये आता फूट पडली असल्याने या दोन्ही गटांचे इच्छुक उमेदवार समोर येणार आहेत. त्यातूनच असंतोषाची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या निवडणुकीत ज्या उमेदवारांनी समोरासमोर लढत दिली त्यापैकी एकाचा विजय झाला, तर दुसर्याचा पराभव. पण आता हे दोन्ही उमेदवार एकाच आघाडीचा भाग झाले असल्याने त्यातूनही एक वेगळा संघर्ष निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला 25 जागा लढवण्याचा आग्रह कायम ठेवला किंवा काँग्रेसने 26 जागा लढवण्याचा निर्णय कायम ठेवला, तर भाजप आघाडीत शिंदे गट आणि अजित पवार गट यांना उर्वरित 23 जागा द्याव्या लागणार आहेत. तशाच प्रकारची तडजोड काँग्रेसला उर्वरित 22 जागांबाबत शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्याबाबत करावी लागणार आहे. पण मुळात गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 23 जागा लढवल्या असल्याने आणि त्यापैकी 19 जागा त्यांनी जिंकला असल्याने त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित आहे आणि हाच फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांचा गटही वापरू शकतो. कारण गेल्या निवडणुकीत निवडून आलेले बहुतेक खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या छत्राखाली असल्याने त्यांना पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून तिकीट मिळावे अशी त्यांची अपेक्षा असणार आहे.
याच गोंधळातून सध्या रायगड, अहमदनगर, सातारा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जे उमेदवार निवडीचे पेच तयार होऊ लागले आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना गांभीर्याने घ्यावे लागणार आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांची आघाडी झाली होती आणि या प्रमुख राजकीय पक्षांचे जे स्वतंत्र मित्र पक्ष होते त्या मित्र पक्षांना या प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या कोट्यातून लोकसभेच्या जागा द्याव्यात असे ठरले होते आणि तसे झालेही होते. साहजिकच यावेळी भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला किंवा आणखीन काही छोट्या-मोठ्या पक्षांना किती जागा द्यायच्या यावरूनही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. असाच विषय महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षावरूनही होण्याची शक्यता आहे.
मुळात अजून प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे भाग आहेत की नाही हे स्पष्ट झालेले नाही. महाराष्ट्रातील 48 जागा या तीन पक्षांमध्ये कशा वाटायच्या हाच कळीचा मुद्दा असताना त्यामध्ये जर अशा प्रकारे वाटेकरी वाढत गेले तर हा गोंधळ अजूनच वाढत जाणार आहे. हा गोंधळ कमी होऊन असंतोषाचे प्रमाणही कमी करावे असे वाटत असेल, तर सर्वच राजकीय पक्षांना आणि प्रमुख राजकीय आघाड्यांना कोणत्या ना कोणत्या फॉर्म्युलाचा वापर करावा लागणार आहे. साधारणपणे कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर करत असताना त्याचे इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेतले जात असल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून आले होते त्या जागा त्या पक्षाला मिळाव्यात मग त्या पक्षाने त्या ठिकाणचे उमेदवार बदलले तरी ती जागा त्या पक्षाला देण्याचा विचार करता येऊ शकतो.
ज्या मतदारसंघांमध्ये पक्षाचा पराभव झालेला आहे पण त्या ठिकाणी पक्षाने दुसर्या क्रमांकाची मते मिळवली आहेत या निकषाचा वापरही जागावाटपाबाबत होऊ शकतो. गेल्या काही कालावधीमध्ये राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्येच फूट पडल्याने हा गोंधळ वाढण्याची तीव्रताही वाढणार आहे. उदाहरणार्थ, काही मतदार संघामध्ये भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला होता. पण हा विजयी उमेदवार सध्या शरद पवार गटात असूनही त्या ठिकाणी अजित पवार गटाने दावा सांगितला आहे, तर भाजपच्या मते ती पराभूत जागा भाजपाची असल्याने त्याठिकाणी भाजपाचा उमेदवार उभा राहू शकतो. या किचकट मतदार संघाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनाच मुत्सद्देगिरीचा कस लावावा लागणार आहे.
म्हणजे दिसायला जरी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन आघाड्या समोर दिसत असल्या तरी या प्रत्येक आघाडीमध्ये तीन घटक पक्ष असल्याने वेगळ्या प्रकारे विचार करता ही सहारंगी लढत होऊ पहात आहे. साहजिकच प्रत्यक्ष मतदारांना सामोरे जाण्यापूर्वी या सर्वच राजकीय पक्षांना प्राधान्याने जागा वाटपाचा आणि उमेदवार निवडीचा प्रश्न तडीस न्यावा लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये समोरासमोर दुरंगी लढत असतानासुद्धा काही मतदारसंघांमध्ये असंतोषाचा आणि बंडखोरीचा फटका अनेकांना बसला होता.
तशाच प्रकारची परिस्थिती यावेळीसुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात जागा वाटप आणि उमेदवार निवड ही एखाद्या कोड्यासारखी गुंतागुंतीची होऊन बसल्याने असंतोषाची परिस्थिती निर्माण होणे अपरिहार्यच आहे. यावेळची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने कोणत्याही राजकीय आघाडीला किंवा घटक पक्षाला अशा प्रकारचा असंतोष परवडणारा नाही, हे निश्चित.