– आरिफ शेख
अफगाणिस्तानमधील बहुतांश भागाचा ताबा घेतल्यानंतरही तालिबानला सरकार चालविणं कठीण जाणार, हा जो अंदाज व्यक्त होत होता, तो खरा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. काश्मीरपासून अनेक मुद्द्यांवर तालिबानी सरकारमध्ये मतभेद होते, ते आता उघडपणे बाहेर आले आहेत.
वीस वर्षांनंतर अफगाणिस्तानची सत्ता हातात आल्यानंतर ती टिकविणं किती अवघड आहे, हे सरकार स्थापन झाल्याच्या आठ दिवसांतच स्पष्ट झाले. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तालिबाननं एक एक भाग काबीज करीत अखेर पंजशीरवरही प्रथमच ताबा मिळविला. काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानला सरकार बनवायला बराच काळ लागला. तालिबान सत्तेवर येण्याआधीच अफगाणिस्तानची बहुतांश गंगाजळी अमेरिकेच्या ताब्यात असल्यामुळे कारभार कसा चालवायचा, हा मोठा गंभीर पेच तालिबानपुढे आहे.
सरकारमध्ये तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचा समावेश आहे. या दोन्ही गटांत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. कोणत्याही देशांविरोधात दहशतवादासाठी आपली भूमी वापरू देणार नाही, असं तालिबानचा प्रवक्ता सांगत असताना मुस्लीम हिताच्या मुद्द्यावर काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याची धमकी दुसरा नेता देत होता. आता तर तालिबानच्या अंतरिम सरकारमध्ये फूट पडली आहे. तालिबानचे सह-संस्थापक मुल्ला घनी बरदार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांमध्ये वाद झाला.
अलीकडच्या काळात मुल्ला बरदार सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. तेव्हापासून अशी चर्चा आहे, की तालिबानमधील नेतृत्वावरून मतभेद समोर आले आहेत. तथापि, तालिबाननं मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तालिबाननं गेल्या महिन्यांत अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि इस्लामिक प्रजासत्ताकातून इस्लामी अमिरातमध्ये अफगाणिस्तानची निर्मिती करण्याची घोषणा केली. तालिबाननं 7 सप्टेंबर रोजी नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली, ज्यात सर्व पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरदार आणि खलील-उर-रहमान यांच्यात हाणामारी झाली. यानंतर दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांशी भिडले.
खलील उर रहमान हा दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा नेता आणि तालिबान सरकारमधील निर्वासित खात्याचा मंत्री आहे. अंतरिम सरकारमध्ये उपपंतप्रधान बनलेले बरदार सरकारच्या संरचनेवर खूश नसल्याने हा वाद झाला. अफगाणिस्तानमधील तालिबानला मिळालेल्या विजयाचे श्रेय घेण्यावरूनही वाद झाले. बरदार यांचा दावा आहे, की त्यांच्या मुत्सद्दीपणामुळे तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळाली आहे, तर हक्कानी नेटवर्कच्या सदस्य आणि समर्थकांचा दावा आहे, की अफगाणिस्तानमध्ये आमच्या लढाईमुळेच विजय मिळाला. दोघांचा हा दावाच आता वादाला खतपाणी घालणारा ठरतो आहे.
2020 मध्ये अमेरिकेचे तत्त्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलणारे बरदार हे पहिले तालिबान नेते आहेत. याआधी त्यांनी तालिबानच्या वतीने दोहा करारात अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. दुसरीकडे शक्तिशाली हक्कानी नेटवर्क आहे, जे अलीकडच्या वर्षांत अफगाणिस्तानातील पाश्चिमात्य सैन्यावरील सर्वांत हिंसक हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. अमेरिकेने तिला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. तिचे नेते सिराजुद्दीन हक्कानी हे तालिबानच्या नवीन सरकारमध्ये गृहमंत्री आहेत.
तालिबानचा सर्वात महत्त्वाचा चेहरा मानला जाणारा बरदार सार्वजनिक कार्यक्रमांमधून गायब झाल्यावर गेल्या आठवड्यात अफवा पसरल्या. वादामुळे बरदार काबूल सोडून कंदहारला गेले, अशा अफवा पसरल्या. बरदार यांच्या नावाने एक ऑडिओ टेप प्रसिद्ध करण्यात आली. तीत बरदार दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. या ऑडिओ टेपमध्ये असे म्हटले आहे, की ते सध्या जिथे आहेत, तिथे ठीक आहेत. ही ऑडिओ टेप तालिबानच्या अनेक अधिकृत वेबसाइटवर पोस्ट करण्यात आली आहे.
तालिबानचं म्हणणं आहे, की सरकारमध्ये कोणताही वाद नाही आणि बरदार सुरक्षित आहेत. बरदार कंधारच्या सर्वोच्च नेत्याला भेटायला गेले होते, असे सांगण्यात आले; परंतु ते थकले आहेत आणि त्यांना विश्रांती घ्यायची आहे, असे सांगितले गेले. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या दाव्यांवर शंका घेतल्या जात आहेत. 2015 मध्ये तालिबानने कबूल केले होते, की त्याने आपला संस्थापक नेता मुल्ला उमरचा मृत्यू दोन वर्षांहून अधिक काळ दडविला होता.
या दरम्यान, तालिबान हा मुल्ला उमरच्या नावाने निवेदने करीत होते. काबूल गाठल्यानंतर बरदार कॅमेऱ्यासमोर येऊ शकतात आणि वादावर पडदा टाकू शकतात. तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतोल्ला अखुंदजादाबद्दलही बरीच अटकळ आहे. तो कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. तालिबानच्या राजकीय, लष्करी आणि धार्मिक घडामोडींची जबाबदारी त्याच्याकडे आहे. या दोन नेत्यांतही शीतयुद्ध असल्याचे सांगितले जाते. शिवाय तालिबानमध्ये अंतर्गत वर्चस्व अन् सत्तासंघर्षाची ठिणगी भविष्यात केव्हाही पडू शकते.
तालिबानचा संस्थापक दिवंगत मुल्ला उमर याचा सुपुत्र मुल्ला याकूब हा सरकारमध्ये सामील आहे. आपल्या वडिलांच्या “पुण्याई’वर तालिबान चळवळ उभी राहिली, बहरली व संघर्ष करीत महासत्तेला हद्दपार केले, असे असताना आपल्यास सापत्न वागणूक मिळू नये किंवा डावलले जाऊ नये, हे मुल्ला याकूबला वाटणे मानवी स्वभाव आहे.
मुल्ला बरदार व मुल्ला याकूब हे जवळचे नातेवाईक आहेत. तालिबानवर वर्चस्व कोणाचे याचा सुप्त संघर्ष होताच. तो उफाळून कधी येईल हे सांगता येत नाही. मुळातच अफगाण ही लढवयी जमात आहे. बाह्य शत्रू असेल तेव्हा ते एकत्र येऊन मुकाबला करतात. जेव्हा बाह्य शत्रू नसेल तेव्हा ते आपसात लढतात, हे त्यांच्याबद्दल जगाचे भाकीत पुन्हा एकदा खरे ठरण्याची चिन्हे आहेत.