टोकियो – टोकियो ऑलिम्पिक पाठोपाठ आता उद्यापासून पॅरालिम्पिक स्पर्धेलाही सुरुवात होत आहे. मुळ ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा भारताने सर्वाधिक सात पदके पटकावली होती. आता त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत पॅरालिम्पिकपटूंकडूनही सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे.
आजपासून सुरू होत असलेली ही स्पर्धा येत्या 5 सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. यात यंदा भारताचे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठे 54 खेळाडूंचे पथक सहभागी होत आहे. 1968 साली भारतीय खेळाडूंनी प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. तिरंदाजी, ऍथलेटिक्स, कॅनोइंग, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस आणि तायक्वांदो अशा नऊ प्रकारांत भारताचे खेळाडू खेळणार आहेत. भारतीय खेळाडूंकडून पाच सुवर्णासह एकूण 15 पदकांची अपेक्षा केली जात असली तरीही प्रत्यक्षात स्पर्धेत खेळाडू कसा खेळ करणार हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.
दोन वेळचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया, उंच उडीपटू मरियप्पन थंगवेलू, बॅडमिंटमध्ये प्रमोद भगत, पारुल परमार, नेमबाजीत दीपक सैनी, रुबिना फ्रान्सिस यांच्याकडून पदकाची सर्वाधिक अपेक्षा आहे. अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधव याच्यावर अपेक्षा आहे. तिरंदाजीत हरविंदर सिंग, राकेश कुमार, ज्योती बलियान यांनीसुद्धा गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
याव्यतिरिक्त टेबल टेनिस, तायक्वांदो, कॅनोइंग या क्रीडा प्रकारांत भारताने एकेक स्पर्धक उतरवला आहे. 1984 आणि 2016 सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रत्येकी चार पदके मिळवली होती. यंदा युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधल्यामुळे भारतीय खेळाडू सर्वाधिक पदके मिळवतील, अशी आशा आहे.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या, मंगळवारी पार पडणार आहे. या उद्घाटन समारंभात भारताचे 11 सदस्यीय पदक सहभागी होणार आहे. यात 5 खेळाडूंसह 6 भारतीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती गुरशरण सिंह यांनी दिली.
स्पर्धेत चमत्कार घडेल – सिंह
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने भारतीय खेळाडूंनी सात पदके जिंकत अफलातून यश मिळवले. त्याच पद्धतीने पॅरालिम्पिकपटूही यश मिळवतील, असा विश्वास पॅरालिम्पिकमधील भारताचे संघप्रमुख गुरशरण सिंह यांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेत भारताने नऊ खेळांसाठी 54 खेळाडूंचा संघ पाठवला असून हा स्पर्धेच्या इतिहासात भारताचा सर्वात मोठा संघ आहे.
पंतप्रधान मोदी यांनी साधला संवाद
पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारताच्या पॅरालिम्पिकपटूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सर्व खेळाडूंना यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. भारताच्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 7 पदके मिळवली. त्यामुळे आता पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी असेच यश मिळवावे यासाठी मोदी यांनी खेळाडूंना प्रेरीत केले. करोनाच्या धोक्यातही तुम्ही सराव कायम ठेवत पॅरालिम्पिक पात्रता मिळवली. तुमचे पदक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल. पण यासाठी आम्ही तुमच्यावर दडपण टाकणार नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खेळा, पदक निश्चित मिळेल, असे मोदी यांनी खेळाडूंशी बोलताना सांगितले.