कोल्हापूर – जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडले असून, मंत्री पद देवून भाजपने केलेले उपकार फेडण्यासाठीच मंत्री राणेंच्या उचापती सुरु आहेत. केंद्रीय मंत्री पदाच्या नशेत असणाऱ्या नारायण राणेंना मानसोपचार तज्ञाची गरज असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, शिवसेनेच्या कृपेने अनेक पदे भोगलेल्या मंत्री नारायण राणेंनी भाजपची लाचारी पत्करून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करत आहेत. जो माणूस खाल्या मिठाला जागला नाही त्या माणसाची शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही.
राणे कुटुंबाच्या सत्तेच्या नशेची भूक अखंड महाराष्ट्र पाहत असून, मंत्री नारायण राणेवर शिवसेनेने केलेले उपकार ते विसरले असून, निदान भाजपने केलेल्या उपकाराचे ऋण तरी त्यांनी फेडावे. पण हे ऋण फेडताना जनसेवेची कामे त्यांनी करावी, भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी उठसुठ शिवसेनेवर टीका करायची हे वागणे बरे न्हवे. केंद्रीय मंत्री पदाची किंमत नारायण राणेंना समजत नसून, गल्लीतील गावगुंडांप्रमाणे त्यांची भाषा असेल तर त्यास तशाच पद्धतीने उत्तर देण्यास शिवसैनिक मागे हटणार नाहीत.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे हे संयमी आणि शांत नेतृत्व आहे. त्यांना अशा टीका टिप्पणी पेक्षा जनसेवेची कामे करण्यात रस आहे. पण, मंत्री नारायण राणे यांचे पद फक्त आणि फक्त शिवसेनेला विरोध करण्यासाठीच असून हा फरक जनता ओळखतेच. ज्या पक्षात राणे जातात तो डबघाईला येतो त्यामुळे अशा अपशकुनी व्यक्तीचे पायगुण भाजपला लखलाभ, अशी टीकाही राजेश क्षीरसागर यांनी केली.