सातारा – रशिया-युक्रेन युद्धाची गडद छाया संपूर्ण जगावर पसरली असताना, युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले सातारा जिल्ह्यातील पाच विद्यार्थी मायदेशात सुखरूप परतल्याने कुटुंबीय व जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतची माहिती जाहीर केली. या पाचपैकी चार विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात परतले आहेत. कराड येथील साद शेख हा विद्यार्थी मंगळवारी (दि. 1) रात्री जिल्ह्यात परतला आहे.
युक्रेनची राजधानी किव्हवर रशियन लष्कराचे संहारक बॉम्बहल्ले सुरू आहेत. तेथे महाराष्ट्रातील 182 विद्यार्थी अडकून पडले होते. केंद्र शासनाने “ऑपरेशन गंगा’ राबवून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणायला सुरुवात केली आहे. या मोहिमेतून महाराष्ट्रातील विद्यार्थी सुखरूप परतले आहेत. कराडच्या मंगळवार पेठेत राहणारा साद आमीर शेख हा विद्यार्थी जिल्ह्यात दाखल झाला.
मुलाला सुखरूप पाहिल्यानंतर आमीर शेख यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. तो घरी परतताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सततचे बॉम्बहल्ले, युक्रेनची सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी, संपत चाललेले पैसे, सेवासुविधांचा अभावर यामुळे आमचा धीर सुटत होता. याही परिस्थितीत आम्ही संयम ठेवला. युद्ध अधिक तीव्र होत असताना, आम्ही जीव मुठीत घेऊन बुडापेस्टच्या विमानतळावर पोहोचलो, असा अनुभव साद शेखने कथन केला.
“ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बुडापेस्ट येथून पाचव्या विमानातून साद मंगळवारी भारतात दाखल झाला. या आधी मनोज दादासाहेब कदम (नरवणे, ता. माण), कौस्तुभ विनोद पाटील (सैदापूर, ता. कराड), शार्दुल हेमंतकुमार जाधव (86, केसरकर पेठ, सातारा), हर्षवर्धन किशोर शिंदे (पिरवाडी, सातारा) हे विद्यार्थी युक्रेनमधून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात
जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून, भारताच्या परराष्ट्र दूतावासांशी संपर्क ठेवला आहे. सातारा जिल्ह्यातील 14 विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये अडकले आहेत. खा. श्रीनिवास पाटील व खा. उदयनराजे भोसले यांची यंत्रणाही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.