नवी दिल्ली – यंदा जी 20 परिेषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. त्यानिमीत्त जी 20 देशांच्या विविध विषयांवरील परिषदा वर्षभर भारतात होणार आहेत. त्यातील पहिली बैठक बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. ती 13 ते 15 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.
त्यात सदस्य देशांच्या वित्त विभागाचे अधिकारी तसेच त्यांच्या सेंट्रल बॅंकांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, अजय सेठ यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली. या बैठकीसाठी जी 20 संघटनेच्या सदस्य देशांखेरीज अन्य देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. सेठ म्हणाले की या वर्षभराच्या काळात प्रमुख जागतिक आर्थिक गटाचे नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे.
ते म्हणाले की आम्ही या देशांच्या वित्त विभागाच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा करू त्यानंतर जी 20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि सेंट्रल बॅंक गव्हर्नर्सची बैठक फेब्रुवारी महिन्यात बंगळुरू मध्येच आयोजित करण्यात आली आहे.
जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक समस्या, आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना मजबूत करणे,वित्तीय समावेशन, पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा, आरोग्य वित्तपुरवठा, आंतरराष्ट्रीय कर आकारणी यासारख्या विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.