केंदूर(प्रतिनिधी) – करंदी गावचे सुपुत्र आणि सिव्हिल इंजिनिअर त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक असलेले उच्च शिक्षित कवी, साहित्यिक शंकर जांभळकर यांना शिरूर तालुका बाजार समितीच्या सभापती पदाची संधी मिळाल्याने करंदी गावचे ग्रामस्थ आनंद व्यक्त करत आहेत.
जांभळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून २०१० मध्ये राजकारणात सक्रीय सहभाग घेतला त्यानंतर त्याच वर्षी झालेल्या करंदी ग्रामपंचायत निवडणूकिमध्ये एकहाती सत्ता प्रस्थापित करत गावातील विकास कामासाठी प्रयत्न केले त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने विध्यार्थी काँग्रेसच्या राज्याच्या सरचिटणीस पदी काम करण्याची संधी दिली. त्यावेळी पक्ष संघटना बळकट करत राजकारणात भक्कम पाय रोवला, दरम्यान २०१२ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाने जांभळकर यांना डावलल्यामुळे करंदी ग्रामस्थांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या राज्य उपाध्यक्ष पदी देखील योग्य कामगिरी करत संघटना मजबुतीसाठी कार्य केले होते.
त्यानंतर पुन्हा २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणूकी दरम्यान जांभळकर यांच्या पत्नी दिव्या जांभळकर यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी माघीतली होती. मात्र पक्षाने सविता बगाटे यांना उमेदवारी दिल्यानंतर जांभळकर यांनी बगाटे यांना निवडून आणण्यासाठी भरीव कामगिरी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकित जांभळकर यांना पक्षाने संधी दिली होती. त्याच संधीचं सोनं करत जांभळकर यांनी तालुक्यात सर्वोच्च मते मिळवत विजयश्री खेचून आणला होता.
सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित तरुण आज सभापती पदावर पोहोचल्याने आणि करंदी गावाला पहिल्यांदाच अशा तालुक्याच्या प्रमुख पदावर संधी मिळाल्याने जांभळकर यांच्या रूपाने तालुक्यात करंदी गावाला न्याय मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणार असल्याचे जांभळकर यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.