वसाहतीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या समस्यांची घेतली दखल; उपमहापौर ढोणे यांनी केली होती परिसराची पाहणी
नगर (प्रतिनिधी) – रस्त्यावर वाहणारे गटारीचे घाण पाणी, साचलेला गाळ, घराजवळ वाढलेली बाभळीची झाडे… पावसाळ्यात घरात पाणी येऊ नये म्हणून घरांवर व घराच्या बाजूने लावलेले प्लॅस्टिकचे कागद टाकून पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब या दयनीय अवस्थेत राहत असून पोलिसांच्या कुटुंबियांची आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत उपमहापौर यांनी पोलीस मुख्यालयाची पहाणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्याची आज प्रत्यक्ष कामात सुवात झाली असून लवकरच वसाहतीत स्वच्छ केली जाणार आहे.
सर्जेपुरा येथील पोलीस मुख्यालयात ब्रिटिशकालीन घरे असल्याने घरांची दुरवस्था झाली आहे. हीच घरे दुरुस्त करून, पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिलेली आहेत. या पोलीस कॉलनीमध्ये 512 खोल्या आहेत. त्यातील अनेक खोल्या राहण्यासाठी योग्य नाहीत. त्यामधिल साडेतीनशे खोल्यामध्ये पोलिसांची कुटुंबे राहतात. रात्रं-दिवस ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय घानीच्या सांम्राज्यात राहत आहेत.
पोलीस कॉलनीच्या बाजूला असलेल्या नाल्यांमधील पाणी घरांपर्यंत येते. त्यामुळे रस्त्यावर गाळ साचून दुर्गंधी सुटली आहे. तर काही भागांमध्ये कॉलनीमधील गटारे फुटून पाणी घरात शिरले आहे. तसेच वीजपुरवठ्याचे खांब जुने झाले असून, या खांबांवरून वीजवाहक तारांना मोठ्या प्रमाणात झोळ पडला आहे. त्यामुळे विद्युतप्रवाह उतरून विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याबाबत उपमाहापौर मालनताई ढोणे यांनी पोलीस कॉलनीमधील समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन शुक्रवारी दिले होते. व लगेच संबंधित विभागाचे अभियंता सुरेश राऊत, उपअभियंता अनिल राजभोज, अभियंता सोनवणे, महापालिकेचे अभियंता मनोज पारखे यांना सूचना केल्या. त्यानंतर आज लगेच नाल्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे.