चाकण येथील निर्धार मेळाव्यात उपनेते आढळराव पाटलांचा घणाघात
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपयश येण्यामागे पुण्याचे खासदार गिरीश बापट हेच कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातही शिवसेनेला अपयश आले, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे संपर्क नेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.
शिवसेनेच्यावतीने चाकण येथे रविवारी (दि. 3) निर्धार मेळावा घेण्यात आला. या निर्धार मेळाव्यात आढळराव बोलत होते. यावेळी खेडचे माजी आमदार गोरे, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख माऊली कटके, महिला जिल्हा संघटक विजया शिंदे,सेनेचे नेते अशोक खांडेभराड, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे,उपसभापती भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमूख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे,अरुण गिरे, प्रकाश वाडेकर, नंदा कड, कामगार नेते इरफान सय्यद, राजू जवळेकर, आरपीआयचे तालुका प्रमुख संतोष डोळस, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, देविदास दरेकर, माजी सदस्य किरण मांजरे, पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे, मच्छिंद्र गावडे, अमर कांबळे, ज्योती अरगडे, सुनीता सांडभोर, संजय घनवट, विजय शिंदे, अमर शिंदे, संभाजी कुडेकर, मारुती सातकर, राहुल गोरे, उमेश गोरे, किरण गवारे, लक्ष्मण जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, ज्यांच्याबरोबर युती आहे. त्या पक्षाने पाठीत खंजीर खुपसला आहे. मित्र पक्षाची ही कृती आम्ही जवळून पहिली आहे. खेडच्या भाजप प्रणित उमेदवाराला थांबविण्यासाठी बापट यांनी मला शब्द दिला होता; मात्र ऐनवेळी त्यांनी शब्द बदलला, असा घणाघात त्यांनी केला.
सुरेश गोरे म्हणाले की, कार्यकर्त्यांची खंत अंतर्मुख करणारी आहे. मला अपयश येऊनही कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत याचा अभिमान आहे. 5 वर्षे अहोरात्र काम केले नात गोत सोडून काम केले. विकासाची दिशा देणारे काम केले. 10 वर्षांची सत्ता उलथून टाकली. तालुक्याला लागलेले गुन्हेगारीचे ग्रहण सोडवले. जनतेमुळे ते घडून आले. गावे एकसंघ ठेवली सर्वाना न्याय देण्याचे काम केले. जनतेची कामे, अपेक्षा प्रश्न समस्या सोडविण्याचे काम केले. आठ दिवस मी निवडणुकीचा आपला पराभव का झाला याचे चिंतन करीत आहे. त्यामुळे निर्धार मेळावा घेतला आहे.
आता थांबायचे नाही. आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला कमी पडलो. जे भाजपचे खरे कार्यकर्ते होते त्यांनी मित्रपक्ष म्हणून ते आमच्यासोबत राहिले जे आपले नव्हते ते दुसरीकडे गेले. निवडून येणार नाहीत याची माहिती असताना भाजपचा उमेदवार कसा उभा राहिला? त्या उमेदवारात व्यक्तिदोष आहे. गिरीश बापट यांनी त्यांना पाठिंबा दिला खरे तर म्हणजे सर्वांत मोठा दुखवटा आहे. त्यांच्या नेतृत्वाने शिवसेनेला अडचण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपण केलेली कामे अपुरी राहाहातात की काय ही खंत मनात राहणार आहे पराभवाने मी खचणार नाही वज्रमुठ बांधून आव्हानांना सामोरे जाणार आहोत. पक्ष संघटनेत बदल केले जातील. पक्ष निष्ठा नसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये त्यांना सोडणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. पुन्हा नव्या दमाने कामाला लागा काम करणाऱ्याला पद, जो फितूर आहे त्याला बाजूला ठेवले जाईल.
– सुरेश गोरे, माजी आमदार